जागतिक बाजारपेठांमध्ये भू-राजकीय तणाव आणि व्यापारातील अडथळ्यांमुळे काही प्रमाणात अस्थिरता निर्माण झाली असली, तरी पुण्यातील लघु व मध्यम उद्योग (एसएमई) आपल्या वाढीच्या शक्यतांबाबत ठाम आत्मविश्वास दाखवत आहेत. देशांतर्गत मागणी मजबूत राहणे आणि उद्योगांचे धोरणात्मक नियोजन यामुळे भारतीय एसएमई विस्ताराच्या दिशेने वाटचाल करत असल्याचे राष्ट्रीय निर्देशकांवरून दिसून येते.
आर्थिक वर्ष २०२६ च्या दुसऱ्या तिमाहीसाठी सिडबी (SIDBI) च्या एमएसएमई आउटलुक सर्व्हेनुसार आयात शुल्काचा काहीसा दबाव असला, तरी सणासुदीचा हंगाम, स्थिर बाजारपेठेतील मागणी आणि जीएसटीचे सुलभीकरण यांसारख्या धोरणात्मक उपायांमुळे आगामी तिमाहींबाबत सकारात्मक अपेक्षा व्यक्त करण्यात आल्या आहेत.
पीएचडी चेंबरच्या एसएमई मार्केट सेंटिमेंट इंडेक्समधूनही हा आशावाद अधोरेखित झाला आहे. मागणी आणि रोजगाराबाबत काही चिंता असली तरी उद्योजक भांडवली गुंतवणूक वाढवण्यास तयार असल्याचे यातून दिसून येते. पुरवठादारांच्या वितरण वेळेत झालेली सुधारणा आणि प्रभावी इन्व्हेंटरी व्यवस्थापनामुळे उद्योग वाढत्या कामकाजासाठी सज्ज होत असल्याचे संकेत मिळत आहेत.
पुणे हे देशातील सर्वात गतिमान एसएमई परिसंस्थांपैकी एक म्हणून ओळखले जाते. जिल्ह्यात सुमारे ४.५ लाख नोंदणीकृत एमएसएमई असून त्यापैकी जवळपास १ लाख उत्पादन क्षेत्रातील तर सुमारे ३.५ लाख सेवा क्षेत्रातील उद्योग आहेत. त्यामुळे महाराष्ट्रातील सर्वात मोठे आणि वैविध्यपूर्ण एमएसएमई केंद्र म्हणून पुण्याने आपले स्थान कायम ठेवले आहे.
अभियांत्रिकी कौशल्य, ऑटो कंपोनंट उत्पादन, आयटी सेवा, अचूक उत्पादन आणि कुशल मनुष्यबळ यांचे मजबूत मिश्रण पुण्याला जागतिक अनिश्चिततेच्या काळातही स्पर्धात्मक आघाडीवर ठेवते. स्थानिक एसएमई सध्या व्यवसायाचे वैविध्यीकरण, तंत्रज्ञानातील सुधारणा आणि निर्यात वाढवण्यावर भर देत आहेत.
या संदर्भात कोटक महिंद्रा बँकेचे एसएमई प्रमुख शेखर भंडारी म्हणाले, “भारतातील एसएमई, विशेषतः पुण्यासारख्या औद्योगिक केंद्रांतील उद्योग, स्पष्ट दृष्टी आणि मोठी महत्त्वाकांक्षा दाखवत आहेत. शिस्तबद्ध आणि दीर्घकालीन दृष्टीकोनामुळे हे उद्योग भविष्यात मोठ्या उद्योगसमूहांमध्ये रूपांतरित होण्याच्या दिशेने वाटचाल करत आहेत.”
वाढत्या मागणीच्या पार्श्वभूमीवर कोटक महिंद्रा बँक पुणे, नाशिक, नागपूर, छत्रपती संभाजीनगर आणि कोल्हापूर यांसारख्या प्रमुख एमएसएमई केंद्रांमध्ये आपली उपस्थिती वाढवत आहे. या विस्तारामुळे प्रादेशिक स्तरावर आर्थिक सेवा अधिक जलद आणि प्रभावीपणे उपलब्ध होणार आहेत.
अहमदनगर, बारामती, नाशिक आणि छत्रपती संभाजीनगर यांचा समावेश असलेला विस्तृत पुणे प्रदेश मजबूत कनेक्टिव्हिटी आणि वैविध्यपूर्ण उद्योगरचनेमुळे महत्त्वाचा एसएमई कॉरिडॉर बनत आहे. मजबूत औद्योगिक पाया, कुशल मनुष्यबळ आणि उत्तम पायाभूत सुविधा यामुळे या प्रदेशात उत्पादन, सेवा आणि नव्या क्षेत्रांमध्ये उद्योगवाढीस चालना मिळत आहे.
चाकण, तळेगाव, रांजणगाव आणि हिंजवडी या प्रमुख औद्योगिक भागांमध्ये हा आत्मविश्वास स्पष्ट दिसून येतो. येथे उद्योग ऑटोमेशनचा वापर वाढवत आहेत, पुरवठा साखळी अधिक मजबूत करत आहेत आणि विशेष उत्पादने विकसित करून नवीन बाजारपेठांमध्ये विस्तार करत आहेत.
उद्योगतज्ज्ञांच्या मते, पुण्यातील एसएमईंचा दूरदृष्टी असलेला आणि धोरणात्मक दृष्टिकोन त्यांना इतर भागांतील उद्योगांपेक्षा वेगळे स्थान देतो. सुधारलेली लॉजिस्टिक व्यवस्था आणि देशांतर्गत मजबूत पायाभूत सुविधा या उद्योगांच्या प्रगतीला अधिक बळ देत आहेत.





