आषाढी वारीच्या निमित्ताने पुणे येथे वारकऱ्यांसाठी आयोजित‘प्रथमोपचा
पुणे – जीवनात कोणत्याही वेळी अपघाती प्रसंग किंवा वैद्यकीय मदतीची गरज उद्भवू शकते.अशा वेळी रुग्णालयात जाण्यापूर्वी मिळणारे प्रथमोपचार हे केवळ उपचार नसून ते जीवदान ठरू शकतात.सध्या सुरू झालेल्या आषाढी वारीसारख्या प्रवासादरम्यान किरकोळ दुखापतींपासून ते गंभीर आजारासारखी कोणतीही स्थिती निर्माण झाल्यास अशा वेळी घाबरून न जाता धैर्याने परिस्थिती हाताळण्यासाठी आणि प्रत्यक्ष डॉक्टरांकडे नेण्यापूर्वी रुग्णाची स्थिती अधिक बिघडू नये,याकरिता प्रथमोपचाराचे मूलभूत ज्ञान असणे अत्यंत आवश्यक आहे, याच उद्देशाने हिंदु जनजागृती समितीच्या वतीने आषाढी वारी निमित्त 10 जुलै रोजी नाना पेठेतील श्रीराम मंदिर येथे सकाळी आणि पंडित दीनदयाळ उपाध्याय शाळा, एरंडवणा या ठिकाणी सायंकाळी वारकरी बंधूंसाठी मोफत प्रथमोपचार शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.या दोन्ही शिबिराला 200 हून अधिक वारकऱ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

शिबिरातील सहभागी वारकऱ्यां ना प्रामुख्याने रुग्णाची श्वास पडताळणी कशी करावी आणि मनगट तसेच गळ्याची नाडी कशी तपासावी, खांदा निखळणे, बरगड्यांना अस्थिभंग होणे,तसेच हाताला दुखापत झाल्यास त्रिकोणी पट्टीच्या साहाय्याने दंड झोळी किंवा मनगट झोळी कशी बांधावी,डोक्याला जखम झाल्यास बँडेज बांधणे आणि रोलर बँडेजचा वापर करणे,गंभीर रुग्णाचा प्रतिसाद तपासणे आणि हृदयक्रिया बंद पडलेल्या रुग्णाच्या छातीवर दाब देऊन (CPR) त्याचे प्राण कसे वाचवावेत अशा विषयी केवळ माहिती न देता प्रत्यक्ष प्रात्यक्षिके सौ.रेवती पेठे आणि सौ.हेमलता म्हात्रे, सौ.अर्चना पावगी यांनी दाखवली.
उपस्थित सर्व वारकऱ्यांनी या प्रशिक्षण शिबिराचा लाभ घेऊन आपल्या शंकांचे निरसन करून घेतले. या शिबिरासाठी श्रीराम मंदिर आणि पंडित दीनदयाळ उपाध्याय शाळा,एरंडवणा यांनी उपक्रम यशस्वी होण्यासाठी मोलाचे सहकार्य केले.प्रथमोपचाराचे हे प्रशिक्षण घेऊन वारकरी आता वारीच्या वाटेवर स्वतःची आणि आपल्या सहकार्यांची आरोग्यविषयक काळजी अधिक सक्षमपणे घेऊ शकतील,असा विश्वास समितीने व्यक्त केला आहे.





