आषाढी वारीच्या काळात पंढरपुरात सलग १० दिवस मास-मटन विक्रीस बंदी; पालकमंत्री जयकुमार गोरे यांची घोषणा

पंढरपूर: आषाढी वारीचा पवित्र सोहळा जवळ आला असून लाखो वारकरी विठुरायाच्या दर्शनासाठी पंढरीकडे मार्गस्थ झाले आहेत. याच पार्श्वभूमीवर यंदा आषाढी वारीच्या इतिहासात प्रथमच पंढरपुरात सलग दहा दिवस मास-मटन विक्रीस बंदी घालण्यात आली आहे.

गेल्या अनेक वर्षांपासून वारकरी संप्रदाय व संत मंडळी यांनी वारीच्या काळात पंढरपूर शहरासह पालखी मार्गावरील गावांमध्ये मास व मटन विक्री बंद ठेवावी, अशी मागणी सातत्याने केली होती. अखेर यावर्षी या मागणीला यश आले असून राज्य शासनाने यावर सकारात्मक निर्णय घेतला आहे.

पालकमंत्र्यांचा निर्णय – जिल्हाधिकाऱ्यांना सूचनाः
सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांना आषाढी एकादशीपूर्वी सात दिवस आणि एकादशीनंतर तीन दिवस अशा एकूण दहा दिवस पंढरपूरमध्ये मास व मटन विक्रीस बंदी घालण्याच्या सूचना दिल्या. त्या अनुषंगाने जिल्हा प्रशासनाने शहरात दहा दिवसांसाठी मास-मटन विक्री बंद ठेवण्याचे आदेश काढले आहेत. याआधी केवळ तीन दिवस अशी बंदी असायची.

पालखी ज्या गावात थांबेल तिथेही बंदी:
पालखी सोहळ्यात ज्या गावात पालखी पोहोचेल, त्या गावात पालखी मुक्कामी थांबेल आणि पुढे निघेपर्यंत त्या संपूर्ण कालावधीत संबंधित गावात मास विक्री बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या निर्णयाचे वारकरी संप्रदायातून स्वागत करण्यात येत आहे. हा निर्णय फडणवीस सरकारच्या संमतीने अमलात आणण्यात आला आहे.

पालख्या पुण्यातून मार्गस्थ:
दोन दिवसांच्या मुक्कामानंतर संत तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालख्या आता पुण्यातून पंढरीच्या दिशेने रवाना झाल्या आहेत. ज्ञानेश्वर महाराजांची पालखी सकाळी ६ वाजता पुण्यातील विठोबा मंदिरातून निघून दिवेघाटमार्गे सासवडकडे मार्गस्थ झाली आहे. तर तुकाराम महाराज पालखीचा आजचा मुक्काम लोणी काळभोर येथे असणार आहे.

वारकरी भाविकांमध्ये या निर्णयामुळे समाधानाचे वातावरण असून पवित्र वारीच्या काळात धार्मिक शिस्त राखण्याच्या दृष्टीने ही सकारात्मक पावले उचलल्याबद्दल शासनाचे अभिनंदन होत आहे.