प्रतिनिधी – मानस, पुणे : शहरात एक दिवसाआड पाणीपुरवठा सुरू झाल्यानंतर घोरपडी परिसरातील भीमनगर भागात पाणीटंचाईची समस्या अधिकच तीव्र झाली आहे. या पार्श्वभूमीवर संतप्त महिलांनी शुक्रवारी रास्ता रोको आंदोलन करत प्रशासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी केली.
भीमनगर परिसरात गेल्या अनेक वर्षांपासून पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायम असून नागरिकांना नियमित आणि पुरेशा दाबाने पाणी मिळत नसल्याची तक्रार आहे. यापूर्वीही स्थानिक नागरिकांनी विविध आंदोलनांच्या माध्यमातून प्रशासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, त्यावेळी दिलेली आश्वासने कागदावरच राहिली असून प्रत्यक्षात परिस्थितीत कोणताही बदल झालेला नसल्याचा आरोप आंदोलकांनी केला.
शहरात सध्या एक दिवसाआड पाणीपुरवठा सुरू असल्याने भीमनगरमधील नागरिकांचे हाल अधिक वाढले आहेत. विशेषतः परिसरातील घरगुती कामगार महिलांना पाण्यासाठी अतिरिक्त वेळ खर्च करावा लागत असल्याने त्यांच्या रोजच्या कामांवर परिणाम होत आहे. अनेक महिलांना पाणी भरण्यासाठी पहाटेपासून रांगा लावाव्या लागत असल्याचेही यावेळी सांगण्यात आले.
पाणीटंचाईच्या समस्येमुळे संतप्त झालेल्या महिलांनी रस्त्यावर उतरून रास्ता रोको आंदोलन केले. प्रशासनाच्या विरोधात घोषणाबाजी करत तात्काळ नियमित आणि पुरेशा दाबाने पाणीपुरवठा सुरू करण्याची मागणी त्यांनी केली.
दरम्यान, पाणीपुरवठ्याचा प्रश्न तातडीने सोडवला गेला नाही, तर यापेक्षाही तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा आंदोलक महिलांनी प्रशासनाला दिला आहे. त्यामुळे भीमनगरमधील पाणीप्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.





