मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची नुकतीच पाच रेडिओ जॉकींनी घेतलेली मुलाखत सध्या प्रचंड चर्चेत आहे. या मुलाखतीत त्यांनी विविध प्रश्नांना दिलखुलास आणि मिश्किल शैलीत उत्तरं दिली. त्यांच्या कविता, गीते, मॉडेलिंगचे किस्से आणि सहज काव्यवृत्ती यावर त्यांनी भरपूर बोलत प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले.
“मॉडेलिंग अपघात होता, नंतर कधीही हिंमत केली नाही”
मुलाखतीत फडणवीस यांना त्यांचं जुने मॉडेलिंगचे फोटो दाखवण्यात आले. यावर त्यांनी खुलासा केला की, “मॉडेलिंग हा अपघात होता. तो माझ्या मित्रांनी केलेला प्रँक होता. त्यानंतर मात्र मी कधीही मॉडेलिंग करण्याची हिंमत केली नाही.” यावर त्यांनी मिश्किल भाष्य करत सांगितले की, “कुत्रा माणसाला चावला तर बातमी नसते, पण माणूस कुत्र्याला चावला तर ती बातमी होते!”
“रामावर, शंकरावर गीत लिहिलंय; शोधा माझं अजून एक गाणं”
कविता आणि गीतलेखनाविषयी बोलताना फडणवीस म्हणाले, “राम जन्मभूमीच्या काळात मी रामावर एक गाणं लिहिलं होतं. तसंच शंकरावरही गाणं लिहिलं आहे आणि ते शंकर महादेवन यांनी गायले आहे.” त्यांनी याशिवाय अजून एक गाणं लिहिलं असून त्याचा शोध तुम्हीच घ्यावा, असंही मिश्किलपणे आव्हान दिलं.
“तसा मी रामदास आठवले घराण्याचा कवी”
कवितेच्या गप्पांदरम्यान फडणवीस यांनी केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांचं नाव घेत मिश्किलपणे म्हटलं, “तसा मी रामदास आठवले घराण्याचा कवी आहे!” यानंतर त्यांनी आरजेंना उद्देशून एक शीघ्रकविता सादर केली –
“तुम्ही आहात आरजे,
तुम्हाला ‘एत’ नाही फारसे,
बाहेर लावलेत…”
त्यांनी स्वतःची एक कविता वाचूनही दाखवली, ज्यामुळे स्टुडिओमध्ये हास्याची लाट पसरली.
आशिष शेलार यांनी रेडिओचं महत्त्व अधोरेखित केलं
या कार्यक्रमात राज्याचे मंत्री आशिष शेलार यांचाही सहभाग होता. त्यांनी रेडिओचं महत्त्व सांगताना म्हटलं, “पूर्वी दुसरे कोणतेही माध्यम नव्हते. तेव्हा रेडिओने सांस्कृतिक परंपरेचं जतन करत ते जनतेपर्यंत पोहोचवण्याचं मोलाचं काम केलं.”
ते पुढे म्हणाले, “आज रेडिओमध्ये बरेच बदल झाले असून, ते एक प्रभावी माध्यम बनलं आहे. म्हणूनच आपल्या राज्याने देशात पहिल्यांदा गानसम्राज्ञी आशाताई भोसले यांच्या नावाने पुरस्कार सुरु केला.”
“आशाताईंचे गाणे ऐकत आम्ही मोठे झालो आहोत, त्यामुळे त्यांच्या कार्याला सलाम,” अशी भावनाही त्यांनी व्यक्त केली.
या मुलाखतीतून देवेंद्र फडणवीस यांचं सौम्य, विनोदी आणि कलात्मक व्यक्तिमत्त्व उलगडताना पाहायला मिळालं. कविता, गीते, आणि जुन्या आठवणींमधून त्यांनी श्रोत्यांना एका वेगळ्या फडणवीसांची ओळख करून दिली.