प्रतिनिधी – मानस : पश्चिम आशियात सुरू असलेल्या युद्धजन्य परिस्थितीचा परिणाम आता जगभरातील इंधन पुरवठ्यावर होत असून भारतालाही त्याची झळ बसू लागली आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासीयांना इंधन बचतीचे आवाहन केले आहे. तसेच शाळांनी काही काळासाठी ऑनलाईन वर्गांची सुविधा उपलब्ध करून द्यावी, असेही त्यांनी म्हटले आहे.
सोमवारी रात्री गुजरातमधील एका कार्यक्रमात बोलताना पंतप्रधान मोदी यांनी देशवासीयांना स्वदेशी पर्यटनाला प्राधान्य देण्याचा सल्ला दिला. उन्हाळी सुट्ट्यांमध्ये परदेशात जाण्याऐवजी भारतातील पर्यटनस्थळांना भेट द्यावी, असे ते म्हणाले. परदेशात ‘डेस्टिनेशन वेडिंग’चा वाढता ट्रेंड पाहता मोठ्या प्रमाणात विदेशी चलन खर्च होत असल्याचेही त्यांनी नमूद केले.
“भारतासारखी पवित्र भूमी दुसरी नाही. आपल्या देशात लग्नसमारंभ झाले तर पूर्वजांचे आशीर्वाद मिळतील,” असे मोदी म्हणाले. त्यांनी परदेशात राहणाऱ्या भारतीयांनाही आवाहन करत, “आपल्या ओळखीतील लोकांना भारतात फिरण्यासाठी आणा. प्रत्येक भारतीयाने किमान पाच जणांना भारतात आणण्याचा प्रयत्न केला, तर देशाच्या अर्थव्यवस्थेला मोठा फायदा होईल,” असे सांगितले.
यावेळी मोदी यांनी इंधन बचतीसाठी नागरिकांनी सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा अधिक वापर करावा, असे आवाहन केले. “जिथे शक्य असेल तिथे पेट्रोल आणि डिझेलचा वापर कमी करा. मेट्रो, इलेक्ट्रिक बस आणि इतर सार्वजनिक वाहतूक साधनांचा वापर वाढवा. खासगी वाहनांचा वापर करताना कारपूलिंगला प्राधान्य द्या,” असे त्यांनी म्हटले.
डिजिटल तंत्रज्ञानामुळे अनेक कामे घरबसल्या शक्य झाली असल्याचे सांगत मोदी म्हणाले, “सरकारी आणि खासगी कार्यालयांनी व्हर्च्युअल बैठका आणि वर्क फ्रॉम होमला प्राधान्य द्यावे. शाळांनीही काही काळासाठी ऑनलाईन वर्ग सुरू करण्याचा विचार करावा.”
सध्याच्या जागतिक संकटामुळे भारताच्या विकासाला अडथळा निर्माण होऊ नये, यासाठी सर्वांनी मिळून प्रयत्न करण्याची गरज असल्याचेही पंतप्रधानांनी स्पष्ट केले.




