पुणे, मार्च : मेट्रो शहरांच्या धावपळीच्या आणि यांत्रिक जीवनात सायकलिंग हे शारीरिक आरोग्यासाठी मोठे वरदान असून त्यामुळे मन आणि शरीर दोन्ही तंदुरुस्त राहतात, असे मत काँग्रेसचे वरिष्ठ प्रवक्ते Gopal Tiwari यांनी व्यक्त केले.
Yashwantrao Chavan यांच्या जयंतीनिमित्त आयोजित ‘लोणावळा–पुणे सायकलिंग स्पर्धे’च्या बक्षीस वितरण समारंभात ते बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बालवडकर शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष आबासाहेब बालवडकर होते.
गोपाळदादा तिवारी पुढे म्हणाले की, महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री स्व. यशवंतराव चव्हाण यांनी केंद्र सरकारमध्ये अनेक महत्त्वाच्या खात्यांची जबाबदारी यशस्वीपणे सांभाळली. त्यांच्या कार्याचा उच्चांक अद्याप कोणत्याही नेत्याने ओलांडलेला नाही, ही महाराष्ट्रासाठी अभिमानाची बाब आहे. तसेच संजय बालगुडे यांनी गेली ३७ वर्षे सातत्याने यशवंतराव चव्हाण यांच्या जयंतीनिमित्त सायकलिंग स्पर्धा आयोजित केल्याबद्दल त्यांनी त्यांचे कौतुक केले.
स्पर्धेचे संयोजक आणि काँग्रेसचे सरचिटणीस संजय बालगुडे यांनी उपस्थितांचे स्वागत केले. पुढील वर्षी वाहतूक कोंडी लक्षात घेता स्पर्धेचे अंतिम ठिकाण ‘भक्ती-शक्ती स्मारक’ असेल, अशी घोषणा त्यांनी केली.
लोणावळा येथून सुमारे ६५ किमी अंतराच्या जुन्या मुंबई–पुणे मार्गावर ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. लोणावळा काँग्रेस अध्यक्ष अतुल गवळी यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून स्पर्धेला सुरुवात करण्यात आली. यावेळी लोणावळा नगरपालिकेचे नगरसेवक आशिष गवळी, सुधीर शिर्के, मोहन औरंगे, प्रकाश रावडे आणि आकाश परदेशी उपस्थित होते.
या स्पर्धेत सुमारे ३२ सायकलपटूंनी सहभाग घेतला. कामशेटपर्यंत आयन तांबोळी, वेदांत कुलकर्णी आणि उमेश वंजारा यांनी आघाडी घेतली होती. तळेगावनंतर सिद्धेश पाटील, आयन तांबोळी आणि हनुमान चोपडे हे आघाडीवर होते. अखेरीस सिद्धेश पाटील यांनी ६५ किमीचे अंतर १ तास १८ मिनिटांत पूर्ण करत प्रथम क्रमांक पटकावला. हनुमान चोपडे यांनी द्वितीय तर आयन तांबोळी यांनी तृतीय क्रमांक मिळवला.
स्पर्धेतील विजेत्यांना रोख पारितोषिके व प्रशस्तिपत्रक देण्यात आली. प्रथम क्रमांकासाठी ११,००० रुपये, द्वितीय क्रमांकासाठी ७,००० रुपये आणि तृतीय क्रमांकासाठी ३,००० रुपये देण्यात आले. तसेच इतर पाच स्पर्धकांना प्रत्येकी ५०० रुपये आणि प्रशस्तिपत्रक देऊन गौरविण्यात आले.
स्पर्धेच्या आयोजनात संजय गवळी, गणेश गवळी, मंगेश बालगुडे आणि हेमंत मिंढे यांचे सहकार्य लाभले. यावेळी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते आणि काँग्रेस पदाधिकारी अनंता गांजवे, भोला वांजळे, नंदकुमार पापळ आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रस्ताविक काळे यांनी केले तर आभार प्रदर्शन भोला वांजळे यांनी केले.





