पुणे: सध्या सुरू असलेल्या आंतरराष्ट्रीय संघर्षाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र तसेच भारतातील अनेक नागरिक दुबई आणि इराण यासारख्या देशांमध्ये अडकून पडले आहेत. हवाई सेवा बंद झाल्याने त्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. अनेकांची उड्डाणे रद्द झाल्यामुळे हॉटेलमध्ये मुक्काम वाढवावा लागत असून, खर्च व इतर व्यवस्थापनाचे प्रश्न निर्माण झाले आहेत.
या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारच्या परराष्ट्र मंत्रालय व विमान वाहतूक विभागाने नागरिकांना सुरक्षितपणे मायदेशी परत आणण्यासाठी व्यापक स्तरावर तयारी सुरू केली आहे. अडकलेल्या प्रवाशांमध्ये विद्यार्थी, पर्यटक तसेच इतर नागरिकांचा समावेश असून त्यांना आवश्यक मदत मिळावी यासाठी समन्वय यंत्रणा सक्रिय करण्यात आली आहे.
दरम्यान, परदेशात अडकलेल्या महाराष्ट्रातील नागरिकांनी कोणत्याही प्रकारची अडचण असल्यास थेट संपर्क साधावा, असे आवाहन राज्यसभा खासदार प्रा. डॉ. मेधा कुलकर्णी यांनी केले आहे. केंद्र शासनाने उपलब्ध करून दिलेल्या सेवा व सुविधा संबंधितांपर्यंत पोहोचवण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील, असे त्यांनी स्पष्ट केले. मदतीसाठी ९४२२०३७३०६ या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
नागरिकांना कोणतीही अडचण येऊ नये, हा केंद्र सरकारचा मुख्य उद्देश असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली आवश्यक ती सर्व तयारी करण्यात येत असल्याचेही त्यांनी सांगितले. संबंधित यंत्रणा नागरिकांच्या सेवेसाठी तत्पर असून परिस्थितीवर सतत लक्ष ठेवण्यात येत असल्याचे त्या म्हणाल्या.









