मुंबई- हिंदु धर्म, हिंदूंचे संत आणि संघटना यांच्यावर सातत्याने अश्लाघ्य चिखलफेक करणारे अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक प्रा. श्याम मानव यांचे ‘बुवा तेथे बाया’ व्याख्यान हे दादर येथे होणार आहे. प्रा. श्याम मानव आणि अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीची वादग्रस्त पार्श्वभूमी पहाता ते निश्चितच हिंदु संतांविषयी अवमानजनक विधाने या व्याख्यानात करतील, याची आम्हाला खात्री आहे. त्यामुळे या व्याख्यानाला अनुमती नाकारावी, अशी मागणी हिंदु राष्ट्र समन्वय समितीच्या वतीने करण्यात आली असून या विषयीचे निवेदन शिवाजी पार्क पोलीस ठाण्यात देण्यात आले. यावेळी निवेदन देतांना राष्ट्रीय वारकरी परिषदेचे कार्याध्यक्ष ह.भ.प. बापू महाराज रावकर, हिंदु जनजागृती समितीचे श्री. प्रसाद मानकर, धर्माभिमानी स्वाती पांडेय, विद्या हरपुडे, सर्वश्री केतन शेंडे, विशाल ठक्कर, संतोष हरपुडे, राहुल पाटकर, सनातन संस्थेचे श्री. चंद्रकांत भदिर्के उपस्थित होते.
अनेक महिलांची फसवणूक करणाऱ्या अशोक खरात प्रकरणानंतर प्रा. श्याम मानव या प्रकरणाचा संदर्भ घेत सर्वच हिंदू बुवा अर्थात प्रवचनकार, संत यांच्यावर चिखलफेक करणारी विधाने करत आहेत. ‘बुवा तेथे बाया’ अशा प्रकारे नाव देऊन त्यांनी महिलांचाही अपमानच केला आहे. यातून सश्रद्ध महिलांना एकप्रकारे निर्बुद्ध समजून हे व्याख्यान देत आहेत. १२ मे या दिवशी सायं ५:३० वा. राजर्षी शाहू महाराज सभागृह, शिवाजी मंदिर, दुसरा मजला, दादर (प.) येथे हे व्याख्यान होत आहे. हिंदु धर्म, संत परंपरा यांविषयी द्वेष बाळगणारे मानव यांनी सामाजिक न्याय विभागाच्या वतीने आयोजित जादूटोणा कायद्याच्या जनजागृती कार्यक्रमात ‘ज्ञानेश्वरांनी रेड्यामुखी वेद वदवले’, हे धादांत खोटे सांगितले जात आहे’, ‘ १४ वर्षाचं कुलकर्ण्याचं पोर काय भिंत चालवणार?’ अशा प्रकारची धार्मिक भावना दुखावणारी अनेक आक्षेपार्ह आणि जातीयवादी विधाने यापूर्वीही केली आहेत.
हा पूर्वानुभव पाहता श्याम मानव आताही व्याख्यानात हिंदु संतांवर बेछूट टीका करतील, तरी असे झाल्यास कायदा आणि सुव्यवस्थेची स्थिती निर्माण होऊ शकते. महिला अंधश्रद्धेपोटी बाबा-बुवांच्या मागे लागतात, अशी सरसकट विधाने करणे, हा समस्त स्त्री-वर्गाचा अवमान आहे. एक प्रकारे स्त्रियांना चारित्र्यहीन ठरवण्याचा प्रयत्न ते करत आहेत. त्यामुळे या व्याख्यानाला अनुमती नाकारावी, असे आवाहन हिंदु राष्ट्र समन्वय समितीने केले आहे. जर हे व्याख्यान झाले आणि त्यात मानव यांनी आक्षेपार्ह विधाने केली, त्यानंतर निर्माण होणाऱ्या परिस्थितीला पोलिस प्रशासन जबाबदार राहील, याची नोंद प्रशासनाने घ्यावी, असे हिंदू राष्ट्र समन्वय समितीने म्हटले आहे.





