पुणे : श्री साई शिव गंगा धाम, हरिद्वार येथे जगातील सर्वात मोठ्या ५२११ किलो वजनाच्या पारद शिवलिंगाची तीन दिवसीय भव्य प्राणप्रतिष्ठा भक्तिभाव, वैदिक मंत्रोच्चार आणि आध्यात्मिक वातावरणात संपन्न झाली. या ऐतिहासिक सोहळ्यास देशभरातील दोन हजारांहून अधिक भाविक, संत-महंत, साधक आणि विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी उपस्थित राहून साक्षीदार होण्याचा मान मिळविला.
या भव्य पारद शिवलिंगाची निर्मिती ध्यान गुरु रघुनाथ गुरुजी यांनी सुमारे दहा वर्षांच्या अखंड साधना, संशोधन आणि पारद विज्ञानाच्या सखोल अभ्यासातून केली आहे. शिवलिंगाच्या निर्मितीत पारा, चांदी, सोने तसेच १०८ प्रकारच्या औषधी वनस्पतींच्या अर्कांचा वापर करण्यात आला आहे. आध्यात्मिक क्षेत्रातील जाणकारांच्या मते, हे जगातील सर्वात मोठे पारद शिवलिंग असून भारतीय अध्यात्म, ध्यान परंपरा आणि पारद विज्ञानाचे अद्वितीय प्रतीक मानले जात आहे.
गुरु गोरक्षनाथ महाराजांच्या परंपरेच्या प्रेरणेने, गिरनारचे पूज्य पीर योगी महंत सोमनाथ बापू यांच्या आशीर्वादाने आणि पद्मभूषण डॉ. विजय भटकर यांच्या मार्गदर्शनाखाली हा भव्य सोहळा पार पडला.
रघुनाथ गुरुजी यांनी सांगितले की, हे शिवलिंग केवळ धार्मिक श्रद्धेचे प्रतीक नसून ध्यान, आत्मचिंतन आणि सकारात्मक चेतना जागृत करणारे एक आध्यात्मिक केंद्र आहे. यापूर्वी २०१९ मध्ये त्यांनी सुमारे दहा हजार लोकांच्या सहभागासह भव्य अश्वमेध यज्ञाचे आयोजन करूनही विशेष लक्ष वेधले होते.
या सोहळ्यास राघव चड्ढा, साध्वी ऋतंभराजी, जगद्गुरू शंकराचार्य स्वामीजी महाराज, श्री सुधांशुजी महाराज, स्वामी कैलाशानंद गिरीजी महाराज, स्वामी अवधेशानंद गिरीजी महाराज, स्वामी रविंद्र पुरीजी महाराज, श्री दिनेशचंद्रजी, विश्व हिंदू परिषदचे वरिष्ठ पदाधिकारी, आचार्य मनीषजी (HIIMS) तसेच राज्य मंत्री व गंगा सभा अध्यक्ष नितीन गौतम यांच्यासह अनेक संत-महंत आणि मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या यशात उद्योगपती व समाजसेवक राजीव बन्सल यांचे विशेष योगदान राहिले. समारोप प्रसंगी रघुनाथ गुरुजी यांनी सर्व संत, भाविक, स्वयंसेवक आणि सहकाऱ्यांचे आभार मानत राजीव बन्सल यांच्या कार्याचे विशेष कौतुक केले. तसेच आदरणीय दादाश्री, मनोज तोषणीवाल परिवार, मनोज गोहाड, आयजी तकवाले, ममता जिवाल, तरुण भंडारी, अमित अग्रवाल, रमेश सांवरथिया, डॉलरभाई कोटेचा, सुधीर अग्रवाल, राजू ओसवाल, जितेंद्र राठी आणि इतर सहकाऱ्यांच्या योगदानाचाही गौरव करण्यात आला.
समारोप प्रसंगी “ध्यानातून शांती, शांतीतून सद्भाव आणि सद्भावातून विश्वकल्याण” हा संदेश देण्यात आला. उपस्थितांनी या भव्य सोहळ्याला अध्यात्म, विज्ञान, सेवा आणि मानवकल्याण यांचा ऐतिहासिक संगम संबोधत भारतीय आध्यात्मिक परंपरेचा गौरवशाली क्षण असल्याचे मत व्यक्त केले.





