पुणे – जागतिक वन दिनानिमित्त “वने ही मानवी जीवनाचा श्वास आहेत” हा संदेश देत सुयश चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने महाराष्ट्रातील विविध भागांत व्यापक वृक्षसंवर्धन उपक्रम राबविण्यात आले. ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष यशवंत घैसास, स्मिता घैसास तसेच कार्याध्यक्षा शलाका घैसास यांनी याबाबत माहिती दिली.
पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी जंगलांचे महत्त्व अनन्यसाधारण असल्याचे सांगताना त्यांनी वाढत्या प्रदूषणामुळे आणि वृक्षतोडीमुळे निर्माण झालेल्या गंभीर परिस्थितीकडे लक्ष वेधले. “प्रत्येकाने किमान एक झाड लावून त्याचे संगोपन केले, तरच भविष्यातील पिढ्यांना शुद्ध हवा मिळेल,” असे आवाहन त्यांनी केले.
या उपक्रमाअंतर्गत पुणे, म्हसवाड, बीड, विंचुरवाडा, गडचिरोली आणि नंदुरबार या भागांमध्ये लावलेल्या वृक्षांचे संवर्धन करून, वृक्षारोपण, पर्यावरण आणि जंगलांचे रक्षण कसे करायचे याची मोहीम राबविण्यात आली. विशेष म्हणजे, केवळ झाडे लावण्यापुरतेच न थांबता त्यांचे संगोपन आणि जतन करण्यावरही भर देण्यात आला. स्थानिक ग्रामस्थ, स्वयंसेवक आणि पर्यावरणप्रेमी यांच्या सक्रिय सहभागामुळे हा उपक्रम प्रभावी ठरला.
या वेळी लहानमूलांमध्ये पर्यावरणाबाबत जनजागृती करण्यात आली. लहान मुलांनीही उत्साहाने सहभाग घेत “आजचे रोप उद्याचा श्वास” हा संदेश प्रत्यक्ष कृतीतून दिला. जंगल हे अन्न, पाणी, हवा आणि संस्कृती जपते.
सुयश चॅरिटेबल ट्रस्टच्या य पुढाकारामुळे ग्रामीण भागातील वाडी, वस्ती, पाड्यांमध्ये हरित चळवळ उभी राहत असून पर्यावरण संवर्धनासाठी समाज एकत्र येण्याची गरज अधोरेखित झाली आहे. भविष्यातही अशा उपक्रमांना अधिक व्यापक स्वरूप देण्याचा निर्धार ट्रस्टच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला.





