शिवाजीनगर, प्रतिनिधी; मानस मते: परिसरातील वैदूवाडी आणि आशानगर भागात महापालिकेच्या पाणीपुरवठा वाहिनीतून आळ्यांचे पाणी येऊ लागल्याने नागरिकांचा संताप उसळला. परिसरातील महिलांनी पाण्याच्या टाकीजवळ एकत्र येत थाळ्या वाजवत प्रशासनाविरोधात जोरदार निषेध नोंदवला.
सेनापती बापट रस्त्यावरील वैदूवाडीत तब्बल आठ ते दहा कुटुंबांना शुक्रवारी (ता.१२) सकाळी आलेल्या पाण्यात आळ्यांसह दूषित पाणी मिळाले. यापूर्वी दररोज सकाळी व संध्याकाळी अशा दोन वेळा पाणीपुरवठा होत होता. मात्र सध्या केवळ सकाळीच पाणी येत असल्याने रहिवाशांमध्ये नाराजी आहे.
स्थानिक आयुष जाधव यांनी सांगितले की, “सकाळी आठ ते साडेआठच्या दरम्यान पाणीपुरवठा होतो. मात्र शुक्रवारी आलेल्या पाण्यात मोठ्या प्रमाणावर आळ्या होत्या.” तर प्रविण डोंगरे म्हणाले, “फक्त वैदूवाडीच नव्हे, तर संपूर्ण गोखलेनगर, जनवाडी, जनतावसाहत या भागांमध्ये दूषित आणि अनियमित पाणीपुरवठ्याची समस्या आहे. प्रशासनाने तातडीने उपाययोजना करावी, अन्यथा नागरिकांना रस्त्यावर उतरावे लागेल.”
महापालिकेचे स्पष्टीकरण
“एप्रिल महिन्यात पाण्याची टाकी स्वच्छ केली होती. आता पुन्हा स्वच्छता करण्यात येणार आहे. सांडपाणी व पिण्याच्या पाण्याच्या वाहिन्या एकाच ठिकाणी असल्याने आळ्या पाण्यात आल्या असाव्यात. तपास सुरू असून हा प्रश्न लवकरच सोडवला जाईल,” असे महापालिकेकडून सांगण्यात आले.








