पुण्यातील ऐतिहासिक सिंहगड किल्ल्याचे पावित्र्य जपण्यासाठी आणि किल्ल्यावरील अतिक्रमणे हटवण्यासाठी जिल्हा प्रशासनाने मोठी कारवाई केली आहे. अवघ्या पाच दिवसांच्या आत गडावरील सुमारे २० हजार स्क्वेअर फुटांवरील अनधिकृत बांधकामे भुईसपाट करण्यात आली आहेत. यामध्ये आरसीसी आणि दगडी बांधकामांचा समावेश आहे. राज्याच्या गडकिल्ले अतिक्रमणमुक्त करण्याच्या मोहिमेअंतर्गत, सिंहगडाच्या इतिहासात पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या प्रमाणावर ही कारवाई करण्यात आली आहे.
सिंहगडावरील कारवाईदरम्यान पर्यटकांना इजा होऊ नये, तसेच कामात कोणताही अडथळा येऊ नये, यासाठी गुरुवारपासून सिंहगड किल्ला पर्यटकांसाठी बंद ठेवण्यात आला होता. विशेषतः नरवीर तानाजी मालुसरे यांच्या समाधीस्थळाकडे जाणाऱ्या मुख्य पायी मार्गावर विनापरवानगी उभारण्यात आलेल्या आरसीसी इमारतींची बांधकामेही पाडण्यात आली. ती पाडताना विशेष काळजी घेण्यात आली.
राज्य सरकारने राज्यातील सर्व गडकिल्ल्यांवरील अतिक्रमणे ३१ मे पूर्वी काढण्याच्या सूचना दिल्या होत्या. या पार्श्वभूमीवर पुणे जिल्हा प्रशासनाने अतिशय गोपनीयता बाळगत गुरुवारी सकाळी गडावरील अनधिकृत बांधकामे पाडण्यास सुरुवात केली. जिल्हाधिकारी आणि पुरातत्व विभागाच्या समन्वयाने ही धडक मोहीम राबवण्यात आली. ज्यामुळे सिंहगड आता अतिक्रमणमुक्त झाला आहे.
सिंहगडाचे ऐतिहासिक पावित्र्य राखण्यासाठी आणि पर्यटकांची गैरसोय टाळण्यासाठी भविष्यात गडावर कोणत्याही प्रकारचे अतिक्रमण होऊ नये, यासाठी जिल्हा प्रशासनाने सर्व संबंधित विभागांना कठोर आदेश दिले आहेत.
डॉ. माने यांनी सर्व विभागांना भविष्यात यावर लक्ष ठेवण्याचे आणि अतिक्रमण रोखण्याचे निर्देश दिले आहेत. या कारवाईमुळे सिंहगडाच्या मूळ सौंदर्याला धक्का पोहोचवणाऱ्या बांधकामांना चाप बसला असून, किल्ला पुन्हा एकदा त्याच्या मूळ स्वरूपात परतण्यास मदत झाली आहे.