शिरूरमध्ये बिबट्यांचा धुमाकूळ; वन विभागाने तीन बिबटे पकडले

By: Editor_Manas

On: Monday, May 11, 2026 5:04 PM

Google News
Follow Us

प्रतिनिधी – मानस : शिरूर तालुक्यात वाढत्या बिबट्यांच्या हालचालींमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असताना वन विभागाने मोठी कारवाई करत पिंपळे धुमाळ आणि संविदणे गावांमधून तीन बिबट्यांना पकडले आहे. बिबट्यांच्या वाढत्या वावरामुळे वन विभागाने विविध ठिकाणी पिंजरे लावण्याची मोहीम सुरू केली असून, आतापर्यंत ५० हून अधिक बिबट्यांना जेरबंद करण्यात यश आले आहे.

पिंपळे धुमाळ येथील शेतामध्ये लावलेल्या पिंजऱ्यात सोमवारी एकाच वेळी दोन बिबटे अडकले. यामध्ये अंदाजे पाच वर्षांची बिबट मादी आणि दीड वर्षांचा बिबट यांचा समावेश आहे. दोन्ही बिबट्यांना सुरक्षितपणे पकडून जुन्नर तालुक्यातील माणिकडोह बिबट निवारा केंद्रात हलविण्यात आले.

तर, संविदणे गावातील अशोक मुलानी यांच्या शेतात लावलेल्या पिंजऱ्यात गेल्या शनिवारी सुमारे आठ वर्षांची बिबट मादी अडकली होती. तिलाही पुढील देखरेखीसाठी माणिकडोह बिबट निवारा केंद्रात पाठविण्यात आल्याची माहिती तालुका वनाधिकारी निळकंठ गव्हाणे यांनी दिली.

गेल्या काही महिन्यांपासून शिरूर तालुक्यात बिबट्यांची संख्या वाढत असल्याचे दिसून येत आहे. काही ठिकाणी बिबट्यांच्या हल्ल्यांत नागरिकांना जीव गमवावा लागल्याच्या घटनांमुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. याच पार्श्वभूमीवर वन विभागाने बिबट्यांच्या प्रभाव क्षेत्रात विशेष मोहीम राबवत पिंजरे लावले आहेत.

या मोहिमेद्वारे आतापर्यंत ५० पेक्षा अधिक बिबट्यांना पकडण्यात आले असून, सर्व बिबट्यांची रवानगी जुन्नरमधील माणिकडोह बिबट्या निवारा केंद्रात करण्यात आल्याचे वन विभागाने सांगितले आहे.

For Feedback - puneprahar2018@gmail.com

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now