पुणे : राज्यातील काही भागांत १७ ते २० मार्चदरम्यान मेघगर्जनेसह वादळी पावसाची शक्यता असल्याचा प्राथमिक अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. दुपारनंतर ढगाळ वातावरण तयार होऊन काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पाऊस, वादळी वारे तसेच तुरळक गारपिटीची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.
हा परिणाम मुख्यतः विदर्भ, मराठवाडा, खानदेश आणि मध्य महाराष्ट्रातील काही भागांत दिसून येण्याची शक्यता आहे. विशेषतः १८ ते २० मार्चदरम्यान हवामानातील बदलांची तीव्रता वाढू शकते, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
दरम्यान, रब्बी पिकांची काढणी सुरू असल्याने शेतकऱ्यांनी हवामानाच्या अद्ययावत अंदाजावर लक्ष ठेवून शेतीची कामे नियोजित करावीत, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे. काढणी केलेली पिके सुरक्षित ठिकाणी साठवून ठेवावीत किंवा झाकून ठेवण्याची व्यवस्था करावी. तसेच वादळी वारे, पाऊस आणि संभाव्य गारपिटीमुळे पिकांचे नुकसान टाळण्यासाठी आवश्यक खबरदारी घ्यावी, असेही विभागाकडून सांगण्यात आले आहे.





