पुणे: गरीब, गरजू, मजूर, वस्ती भागांतील नागरिकांसाठी रुग्ण हक्क परिषदेच्या वतीने ‘पृथ्वी मोबाईल क्लिनिक’चा उपक्रम सुरु करण्यात आला आहे. या उपक्रमांतर्गत अवघ्या पाच रुपयांत आरोग्य तपासणी, औषधोपचार उपलब्ध करून दिले जात आहेत. या उपक्रमातील १११ वे शिबीर बुधवारी झाले असून, आजअखेर १०,०७७ रुग्णांना याचा लाभ झाला आहे, अशी माहिती रुग्ण हक्क परिषदेचे संस्थापक उमेश चव्हाण यांनी पत्रकार परिषदेत दिली. प्रसंगी रुग्ण हक्क परिषदेच्या शहराध्यक्षा अपर्णा साठ्ये-मारणे, डॉ. आदिनाथ लांडे डॉ. अनिकेत मडावी, अमित जागडे, अमोल चव्हाण आदी उपस्थित होते.
उमेश चव्हाण म्हणाले, “एकाच ठिकाणी दवाखाना निर्माण केला असता, तर सगळीकडे सेवा देता आली नसती. त्यामुळे मोबाईल क्लिनिकची संकल्पना राबविली जात आहे. सध्या पुण्यातील ६० ठिकाणी ही आरोग्यसेवा दिली जात असून, यामध्ये दोन डॉक्टर, दोन नर्स, वाहनचालक, एक समन्वयक, दोन मदतनीस कार्यरत आहेत. एमआरआय व सिटी स्कॅन यासारख्या तपासण्याची मोफत केल्या जात आहेत. तसेच गंभीर आजारांवर शस्त्रक्रियांसाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीच्या माध्यमातून अर्थसहाय्य उपलब्ध करून दिले जात आहे. प्रत्येक वस्तीत महिन्यातून एकदा तपासणी व औषधोपचार केले जात आहेत.”
“नियमित तपासणीच्या अभावाने मोठमोठे आजार होतात. आजार अंगावर काढणे, वेळेत उपचार झाले नाहीत, तर तो आजार बळावतो. त्यामुळे आजाराच्या प्राथमिक टप्प्यातच रक्त तपासण्या, औषधोपचार घेणे गरजेचे असते. मात्र, झोपडपट्टीतील, गरीब वस्तीमधील नागरिक, हातावर पोट असणारे मजूर आणि वृद्ध नागरिकांना हॉस्पिटल, तपासण्या आणि मेडिकलमधील औषधांचा लाखो रुपयांमध्ये येणारा खर्च परवडणारा नसतो. परिणामी, आरोग्याकडे दुर्लक्ष होते, आजार बळावतो. हे टाळण्यासाठी आणि गरजूंना दर्जेदार उपचार मिळावेत, या भावनेतून रुग्ण हक्क परिषदेच्या माध्यमातून २५ लाखांच्या स्वखर्चाने हा अद्ययावत ‘व्हॅनिटी’ दवाखाना निर्माण केला आहे. त्यासाठी जनता सहकारी बँकेचे कर्ज घेऊन टाटा विंगर वाहन खरेदी केले आहे,” असे अपर्णा साठ्ये-मारणे यांनी सांगितले.









