Operation Sindoor : भारताला हवे आहेत ‘हे’ ३ आतंकवादी
ऑपरेशन सिंदूरने पाकिस्तानातील ९ दहशतवादी तळ भारताने नष्ट केले आहेत. असे असले, तरी भारताच्या लक्ष्यावर ३ आतंकवादी आहेत. त्यांच्यावर कारवाई झाल्यानंतरच आतंकवाद नष्ट होणार आहे, असे म्हटले जाते. पाकिस्तानातील अनेक आतंकवादी सध्या पाक लष्कर आणि गुप्तहेर संघटनांच्या आश्रयाला ते गेले आहेत. (Operation Sindoor)
भारतात दहशतवादी कारवायांसाठी तीन दहशतवादी कारणीभूत आहेत. ते पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमध्ये दहशतवाद्यांची फॅक्टरी चालवतात. येथे पाकिस्तानातील मुलांना दहशतवादाचे प्रशिक्षणासोबतच शस्त्र चालवणे आणि हल्ला करण्याचे प्रशिक्षण देण्यात येते. पाकिस्तान लष्कराच्या मदतीने हे ट्रेनिंग देण्यात येते. हे तीन दहशतवादी टिपले तर दहशतवादाचे कंबरडे मोडेल.
हाफिज सईद : हा पाकिस्तानी लष्कर आणि सरकारच्या गळ्यातील ताईत आहे. लष्कर-ए-तैयब्बा (Lashkar-e-Taiba) या संघटनेचा तो प्रमुख आहे. ऑपरेशन सिंदूर अंतर्गत त्याला पण जबरदस्त फटका बसला. सध्या तो लष्कराच्या छावणीत लपून बसल्याचा दावा करण्यात येत आहे. भारताविरोधात तो सतत गरळ ओकत असतो.
मसूद अझहर : जैश-ए-मोहम्मद (Jaish-e-Mohammed) या दहशतवादी संघटनेचा संस्थापक. बहावलपूर हे त्याचे गाव आहे. त्याने कराची येथील देवबंदी मदरसामधून धार्मिक कट्टरतावादाचे शिक्षण घेतले. 1994 साली भारताने त्याला अटक केली होती. 1999 मध्ये इंडियन एअरलाईन्सचे अपहरण करून दहशतवाद्यांनी त्याची सुटका केली होती. भारतातील अनेक दहशतवादी हल्ल्यात मसूद अझहरचा हात आहे.
सईद सल्लाहुद्दीन : या दहशतवाद्याचे खरे नाव मोहम्मद युसूफ शाह असे आहे. तो काश्मीरी दहशतवादी आहे. हिजबुल मुजाहिद्दीन (Hizbul Mujahideen) या दहशतवादी संघटनेचा तो प्रमुख आहे. जम्मू आणि काश्मीरमधील दहशतवादी हल्ले याने घडवून आणले आहे. तो संयुक्त जिहाद परिषदेचा अध्यक्ष पण आहे. काश्मीरमधील बडगामजवळील सोईबुग हे त्याचे मुळ गाव आहे. 2021 मध्ये राष्ट्रीय तपास यंत्रणेने NIA ने त्याच्याविरोधात दोषारोपपत्र दाखल केले आहे.
पहलगाम हल्ल्यानंतर भारताने केलेल्या कारवाईत 100 हून अधिक दहशतवादी ठार झाले. त्यात लष्कर-ए-तैयब्बा आणि जैश-ए-मोहम्मद या दोन दहशतवादी संघटनांचे टॉप कमांडर मारले गेले. मात्र भारत गेले अनेक वर्षे आतंक माजवणाऱ्या या ३ आतंकवाद्यांच्या शोधात आहे.