विद्यार्थी सहायक समितीमध्ये कला, संस्कार व सर्जनशीलतेचा संगम

By: Editor_Manas

On: Saturday, May 16, 2026 11:49 AM

Google News
Follow Us

पुणे: “चित्रकला आणि शिल्पकला या भारतीय संस्कृतीच्या वैभवशाली परंपरेचे प्रतीक असून, त्या देशाच्या समृद्ध सांस्कृतिक वारशाचा महत्त्वपूर्ण ठेवा आहेत. कल्पकता, संयम, एकाग्रता आणि समर्पण भाव तुमच्यातील कलाकार अधिक समृद्ध करतो,” असे प्रतिपादन ज्येष्ठ शिल्पकार विवेक खटावकर यांनी केले. शिल्पकलेचा वारसा सांगणाऱ्या खटावकरांच्या तीन पिढ्यांच्या प्रवास विवेक खटावकर यांनी उलगडला.

विद्यार्थी सहायक समितीच्या शिवाजी हौसिंग सोसायटीजवळील लजपतराय विद्यार्थी संकुलात नव्याने उभारण्यात आलेल्या कलादालनाचे उद्घाटन व  कलाकार (आर्टिस्ट) माजी विद्यार्थी मेळाव्यात खटावकर बोलत होते. प्रसंगी ज्येष्ठ चित्रकार मिलिंद मुळीक, समितीचे अध्यक्ष पद्मश्री प्रतापराव पवार, कार्यकारी विश्वस्त तुषार रंजनकर, विश्वस्त तुकाराम गायकवाड, चित्रकार अश्विनी पवार, हेमंत राजहंस, प्रज्ञा सातारकर, संयोजक व विद्यार्थी विकास केंद्राचे प्रभाकर पाटील, हनुमंता जगनगडा, माजी विद्यार्थी मंडळाचे अध्यक्ष गणेश काळे, सचिव मनीषा गोसावी आदी उपस्थित होते.

उद्घाटनानिमित्त भरविण्यात आलेल्या समितीमध्ये राहून कलाविषयक शिक्षण घेतलेल्या आजवरच्या माजी विद्यार्थ्यांच्या कलाकृतींच्या प्रदर्शनाला, तसेच समितीच्या कलाकार माजी विद्यार्थ्यांच्या मेळाव्यालाही उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. हे प्रदर्शन उद्या (रविवार) सायंकाळी ८ वाजेपर्यंत सर्वांना पाहता येणार आहे. तसेच सायंकाळी ५.३० वाजता चित्रकार विलास कुलकर्णी यांच्या जलरंग प्रात्यक्षिकांची अनुभूती कलाप्रेमींना घेता येणार आहे.

विवेक खटावकर म्हणाले, ‘‘कोणतीही कला केवळ सौंदर्य अनुभवण्याचे साधन नसून, भारतीय संस्कृतीची ओळख जपणारी प्रभावी अभिव्यक्ती आहे. कला समाजाला संवेदनशील बनवते आणि पुढील पिढीपर्यंत संस्कार व परंपरा पोहोचवण्याचे महत्त्वपूर्ण कार्य करते. प्रत्येक अनुभव, प्रत्येक कलाकृती आणि प्रत्येक संघर्ष कलाकाराला शिकवून जातो. कला ही आत्मशोध घेण्याची प्रक्रिया आहे. शिल्पकार आणि चित्रकार हे एका नाण्याच्या दोन बाजूंप्रमाणे आहेत. दोघांच्याही अभिव्यक्तीची माध्यमे वेगळी असली तरी भावना, संवेदना आणि सर्जनशीलतेचा आत्मा एकच असतो.”

प्रतापराव पवार म्हणाले, “विद्यार्थ्यांनी केवळ करिअरच्या मागे न धावता आपल्या आयुष्यात विविध छंदही जोपासले पाहिजेत. कला, साहित्य, क्रीडा किंवा इतर सर्जनशील उपक्रम विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्वाला नवी दिशा देतात. कलादालनातून विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना व्यासपीठ मिळेल. समितीने शिक्षणासोबतच विद्यार्थ्यांच्या कला, कौशल्य आणि व्यक्तिमत्त्व विकासासाठी सातत्याने पुढाकार घेतला आहे. सकारात्मक आणि संवेदनशील पिढी घडवण्यासाठी अशा सांस्कृतिक व कलात्मक उपक्रमांची आवश्यकता असते.

मिलिंद मुळीक म्हणाले, “कला ही केवळ छंद किंवा अभिव्यक्तीचे माध्यम नसून ती विद्यार्थ्यांना आत्मनिर्भर बनविण्याची ताकदही देते. अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांना आपल्या कौशल्याचा विकास करण्यासोबतच भविष्यात करिअरच्या नव्या संधी उपलब्ध होऊ शकतात. कलाकारांच्या कलाकृती समाजापर्यंत पोहोचल्या पाहिजेत, त्यांना योग्य बाजारपेठ मिळाली पाहिजे आणि त्यांच्या कलेला आर्थिक मूल्यही प्राप्त झाले पाहिजे. कला आणि व्यवस्थापन यांचा समतोल साधला तरच कलाकारांना खरी ओळख आणि स्थैर्य मिळू शकते.”

तुषार रंजनकर म्हणाले, “विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी आणि त्यांच्या भविष्याच्या घडणीत समितीने नेहमीच पालकत्वाची भूमिका निभावली आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून विविध क्षेत्रातील माजी विद्यार्थ्यांनी आपली कला, कौशल्य आणि सर्जनशीलता समाजासमोर मांडली. कलादालन हे केवळ प्रदर्शन नसून, विद्यार्थ्यांच्या कलागुणांना व्यासपीठ देणारे प्रेरणादायी माध्यम आहे. ”

अश्विनी पवार यांनी त्यांच्यातील कलासक्त व्यक्तिमत्वाविषयी सांगितले. समितीच्या कार्यात आपल्या कलेचा उपयोग व्हावा, यासाठी नियमित सहभागी होणार असल्याचे नमूद केले. हेमंत राजहंस यांनी कलादालनाच्या उभारणीमागील संकल्पना स्पष्ट केली. प्रभाकर पाटील यांनी स्वागत-प्रास्ताविक केले. अनिता देशपांडे यांनी सूत्रसंचालन केले.

For Feedback - puneprahar2018@gmail.com

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Related News

May 16, 2026

May 15, 2026

किर्लोस्कर

May 15, 2026

May 15, 2026

May 15, 2026

May 15, 2026