पुणे : भारतातील आघाडीची दूरसंचार सेवा देणारी Bharti Airtel कंपनीने महाराष्ट्र आणि गोवा राज्यांमध्ये आपल्या 5G नेटवर्कचा मोठ्या प्रमाणावर विस्तार केल्याची घोषणा केली आहे. मागील 12 महिन्यांत 3,400 पेक्षा अधिक नवीन 5G साइट्स उभारण्यात आल्याने ग्राहकांना अधिक वेगवान इंटरनेट, विस्तृत कव्हरेज आणि अधिक स्थिर नेटवर्क अनुभव मिळत आहे.
कंपनीचे महाराष्ट्र व गोवा परिक्षेत्राचे सीईओ रबी शंकर मिश्रा यांनी सांगितले की, राज्यांमध्ये डेटा वापर झपाट्याने वाढत असून, त्या वाढत्या मागणीला प्रतिसाद देण्यासाठी एअरटेल सातत्याने आपल्या नेटवर्कची क्षमता वाढवत आहे. या नवीन साइट्समुळे 2.2 कोटींहून अधिक ग्राहकांना जलद गती, विश्वासार्ह सेवा आणि अखंड कनेक्टिव्हिटीचा लाभ मिळत आहे. विशेषतः विकासाच्या प्रक्रियेत असलेल्या जिल्ह्यांमध्ये करण्यात आलेली गुंतवणूक ही डिजिटल दरी कमी करण्यासाठी महत्त्वाची ठरत आहे.
ग्राहकांच्या डिजिटल गरजा लक्षात घेऊन एअरटेलने ₹399 च्या रिचार्ज प्लॅनमध्ये स्मार्टफोन वापरकर्त्यांसाठी पूर्णपणे अनलिमिटेड डेटा सुविधा उपलब्ध करून दिली आहे. या प्लॅनमुळे स्ट्रीमिंग, ऑनलाइन शिक्षण, वर्क-फ्रॉम-होम आणि दैनंदिन डिजिटल वापर अधिक सुलभ होणार आहे.
हा विस्तार महाराष्ट्र आणि गोव्याच्या सर्व 36 जिल्ह्यांमध्ये करण्यात आला असून, शहरी भागांसह ग्रामीण आणि दुर्गम क्षेत्रांनाही त्याचा लाभ मिळत आहे. विशेषतः गडचिरोली, नंदुरबार आणि सिंधुदुर्गसारख्या जिल्ह्यांमध्ये नवीन साइट्समुळे कनेक्टिव्हिटी सुधारून डिजिटल समावेशनाला चालना मिळत आहे.
दररोज सरासरी 9 पेक्षा अधिक नवीन साइट्स कार्यान्वित होत असल्याने, ग्राहकांना प्रवासात किंवा दुर्गम भागातही अखंड इंटरनेट सेवा अनुभवता येत आहे. या 5G विस्तारामुळे नागरिक, विद्यार्थी, लघु उद्योग, पर्यटक तसेच शासकीय संस्थांच्या डिजिटल व्यवहारांना अधिक गती आणि विश्वासार्हता मिळत आहे.




