पुणे: “भगतसिंह, सुखदेव व राजगुरू यांच्यासह इतर क्रांतिकारकांनी देशासाठी आपल्या प्राणांचे बलिदान दिले. त्यांच्या विचारांचा आदर्श घेऊन राष्ट्रसेवेचे हे व्रत तरुण पिढीने जपावे. सजग, सशक्त व संघटित समाजासाठी तरुणांनी राष्ट्राच्या उभारणीमध्ये चांगले योगदान द्यावे,” असे प्रतिपादन ज्येष्ठ नगरसेविका मंजुश्री खर्डेकर यांनी केले.
पतित पावन संघटनेच्या वतीने शहीद दिनानिमित्त सरदार भगतसिंह, सुखदेव व राजगुरू या क्रांतिकारकांना अभिवादन करण्यात आले. कर्वे रस्त्यावरील सावरकर स्मारक येथे आयोजित अभिवादन कार्यक्रमावेळी पतित पावन संघटनेचे प्रांत सरचिटणीस नितीन सोनटक्के, प्रांत उपाध्यक्ष राजाभाऊ पाटील, पुणे शहराध्यक्ष श्रीकांत शिळीमकर, शहर पालक मनोज नायर, कार्याध्यक्ष गोकुळ शेलार, सरचिटणीस जालिंदर टेमघरे, जिल्हाध्यक्ष सुनील मराठे, अहिल्यानगर जिल्हाध्यक्ष गोरक्षनाथ सोनवणे, कोल्हापूर जिल्हा कार्याध्यक्ष काका मोहिते, शहर संपर्कप्रमुख तेजस पाबळे, उपाध्यक्ष निलेश जोशी व प्रशांत कुरुमकर, संघटक विजय गावडे, संघटक शरद देशमुख, संघटक सौरभ कुलकर्णी, कामगार शिक्षण प्रमुख राजाभाऊ बर्गे, सहसंघटक प्रविण ठाकुर, सहसंपर्कप्रमुख राहुल पडवळ, कोथरूड विभाग अध्यक्ष अण्णा बांगर, उपाध्यक्ष विनोद बागल, शिवाजीनगर विभाग अध्यक्ष अक्षय बर्गे आदी उपस्थित होते.
नितीन सोनटक्के म्हणाले, “शहीदांच्या बलिदानाचे महत्व तरुणांनी लक्षात घेऊन देशासाठी चांगली सेवा द्यावी. देशातील क्रांतिकारकांच्या वारशाची जपणूक करताना समाजात अधिक संघटनात्मक एकजुट व्हायला हवी. छत्रपती शिवाजी महाराज, भगतसिंह, राजगुरू, सावरकर यांच्या बलिदानातून प्रेरणा घेत आधुनिक काळात युवकांनी जागरूकता आणि संघटित कार्यावर भर द्यावा. समाजातील तणाव टाळण्यासाठी एकता आणि सक्रिय सहभाग आवश्यक आहे.”
वयाच्या अवघ्या २२ व्या वर्षी देशासाठी प्राण अर्पण करणाऱ्या भगतसिंह, राजगुरू आणि सुखदेव यांचे स्मरण करणे आपले कर्तव्य आहे. त्यांच्या धैर्य, त्याग आणि राष्ट्रनिष्ठेच्या बळावर त्यांनी इतिहास घडवला. त्यांच्या विचारांचा वारसा पुढे नेणे ही आपली जबाबदारी आहे. नव्या पिढीपर्यंत क्रांतिकारकांचे विचार पोहोचवणे हाच या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश असल्याचे श्रीकांत शिळीमकर यांनी नमूद केले.





