पुण्यातील उच्चशिक्षित जोडपं लव्ह मॅरेजनंतर २४ तासांच्या आत झालं वेगळं; कारण फक्त एवढंच

पुण्यातून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. नवविवाहित उच्चशिक्षित जोडप्याने लग्नाच्या अवघ्या २४ तासांत वेगळं होण्याचा निर्णय घेतल्याने ही घटना देशभर चर्चेचा विषय ठरली आहे. लग्नानंतर झालेल्या मतभेदांमुळे हा वाद थेट न्यायालयात पोहोचला आणि अखेर परस्पर संमतीने घटस्फोट घेण्यात आला.

राणी सोनावणे यांनी दिलेल्या माहितीनुसार, नवरा-बायकोमधील मतभेद इतके तीव्र होते की कोणताही घरगुती हिंसाचाराचा आरोप नसतानाही दोघांनी शांततापूर्ण मार्गाने वेगळं होण्याचा निर्णय घेतला. दोघांनीही कायदेशीर अटींचं पालन करत परस्पर संमतीने काडीमोड घेतला.

वकील सोनावणे यांनी सांगितलं की, हे जोडपं प्रेमविवाहातून लग्नबंधनात अडलं होतं. दोघेही दोन ते तीन वर्षांपासून एकमेकांना ओळखत होते. मात्र, लग्नानंतर दुसऱ्याच दिवशी नवऱ्याने आपल्या नोकरीबाबत स्पष्ट भूमिका मांडली. तो जहाजावर काम करत असल्याने पोस्टिंग कुठे आणि किती काळासाठी मिळेल, तसेच कामानिमित्त किती वेळ घराबाहेर राहावं लागेल, याबाबत निश्चितता नसल्याचं त्याने सांगितलं.

या मुद्द्यावर दोघांमध्ये सविस्तर संवाद झाला. चर्चेनंतर दोघांनीही एकत्र राहणं शक्य नसल्याचं मान्य करत परस्पर संमतीने घटस्फोटाचा मार्ग निवडला. न्यायालयात दोन्ही बाजूंच्या वकिलांचा युक्तिवाद ऐकून निर्णय देण्यात आला.

या प्रकरणातील आणखी एक लक्षवेधी बाब म्हणजे, लग्नाआधी दोघे एकमेकांना ओळखत होते, या मुद्द्यावर न्यायालयात फारशी चर्चा झाली नाही, असं वकील सोनावणे यांनी नमूद केलं. विभक्त झालेली तरुणी डॉक्टर असून तर तरुण इंजिनीअर आहे. तो जहाजावर कार्यरत असल्याची माहितीही समोर आली आहे.