पुणे – राष्ट्रसंत श्री समर्थ रामदास स्वामी महाराज यांनी रचलेल्या ‘मनाचे श्लोक’ या पवित्र धार्मिक ग्रंथाच्या नावाचा वापर करून त्याच नावाने मराठी चित्रपटाची निर्मिती करणे, हा हिंदूंच्या श्रद्धेचा बाजार मांडण्यासारखे आहे. हा समर्थ रामदासस्वामींचा अपमानच आहे. उच्चतम नैतिक मूल्ये शिकवणाऱ्या ग्रंथाचे नाव केवळ मनोरंजन, व्यावसायिक लाभ आणि सवंग प्रसिद्धीसाठी वापरणे, हा कोट्यवधी श्रीरामभक्तांच्या आणि समर्थभक्तांच्या धार्मिक भावना पायदळी तुडवण्याचा प्रकार आहे. संतपरंपरेचा हा अपमान हिंदू समाज कदापि सहन करणार नाही. जर या चित्रपटाचे नाव तात्काळ बदलले नाही, तर हिंदू समाज रस्त्यावर उतरून आंदोलन करेल आणि चित्रपट प्रदर्शित होऊ देणार नाही. शासन आणि सेन्सॉर बोर्डाने याची तातडीने गंभीर दखल घेऊन “मनाचे श्लोक” हे पवित्र नाव चित्रपटाच्या शीर्षकातून हटवण्यासाठी आवश्यक कार्यवाही करावी, अशी मागणी हिंदु जनजागृती समितीचे श्री. पराग गोखले यांनी पुणे येथील पत्रकार परिषदेत केली.
श्री. पराग गोखले पुढे म्हणाले की, या संदर्भात समितीच्या वतीने शासन व सेन्सॉर बोर्डाला निवेदन देण्यात येणार असून, संबंधितांना कायदेशीर नोटीसही पाठवली जाईल. यापूर्वी ‘द डा विंची कोड’ आणि ‘विश्वरूपम’ यांसारख्या चित्रपटांमुळे अनुक्रमे ख्रिस्ती व मुस्लिम धर्मीयांच्या भावना दुखावल्याने अनेक राज्यांत त्यांच्या प्रदर्शनावर बंदी घालण्यात आली होती. या चित्रपटाच्या बाबतीतही कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास त्याला सर्वस्वी चित्रपट निर्माते, दिग्दर्शक आणि सेन्सॉर बोर्ड जबाबदार असतील.”
श्री. गोखले पुढे म्हणाले, ‘‘सर्वोच्च न्यायालयाने लाल बाबू प्रियदर्शी विरुद्ध अमृतपाल सिंग [(2015) 16 SCC 795] या खटल्यात स्पष्ट केले आहे की, ‘रामायण’सारख्या पवित्र ग्रंथांच्या नावांचा वापर व्यावसायिक फायद्यासाठी मक्तेदारी म्हणून करता येत नाही. या तत्त्वानुसार ‘मनाचे श्लोक’ हे नाव चित्रपटासाठी वापरणे कायद्याच्या आणि नैतिकतेच्या विरोधात आहे. भारतीय न्याय संहिता (BNS) कलम २९९ नुसार हेतुपुरस्सर धार्मिक भावना दुखावणे हा एक गंभीर, दखलपात्र आणि अजामीनपात्र गुन्हा आहे.”
यावेळी समस्त हिंदु आघाडीचे कार्याध्यक्ष मिलिंद एकबोटे हेही उपस्थित होते. ‘मनाचे श्लोक हे नाव बदलून मगच सिनेमा प्रदर्शित करावा. अन्यथा याला आम्ही मोठ्या प्रमाणात विरोध करू. तसेच उद्या संध्याकाळी शहरात सर्व मारुती मंदिरात सकल हिंदू समाजाच्या वतीने चित्रपटाच्या निषेधार्थ महाआरती घेण्यात येणार आहे. जर चित्रपट प्रदर्शित झालाच तर सकल समाज तो बंद पाडेल’, असे परखड प्रतिपादन श्री मिलिंद एकबोटे यांनी केले. यावेळी हिंदु राष्ट्र समन्वय समितीचे श्री. सचिन घुले यांनीही पत्रकार परिषदेला संबोधित केले.








