मिरा रोड : प्रेयसी लग्न करण्यास टाळाटाळ करत असल्यामुळे तिच्या प्रियकराने चारित्र्यावर संशय घेउन तिची चाकूने गळा कापून हत्या केल्याची धक्कादायक घटना गुरुवारी मध्यरात्री मिरा रोड येथे घडली. याप्रकरणी मिरा रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होताच पोलीसांनी आरोपीला मिरा रोड येथील तिवारी कॉलेज रोड येथून चार तासांत अटक केली आहे. महापालिकेचे संक्रमण शिबीर असलेल्या इमारतीत तरुणीचा भाऊ, बहीण, चुलत भाऊ, तसेच प्रियकर समशुद्दीन मोहम्मद हाफीज (२४) गेल्या ५ महिन्यांपासून भाड्याने राहात होते.
तरुणी ही बारमध्ये सिंगरचे काम करत होती. तसेच समशुद्दीन देखील हॉटेलमध्ये नोकरी करतो. त्यांचे गेल्या १ वर्षापासून प्रेमसंबंध होते. ते लवकरच लग्न करणार होते; परंतु तरुणी हि त्याला आपण पैसे कमावू व त्यानंतर लग्न करू असे बोलत होती.
मागील आठवड्यापासून तरुणी व तिचा प्रियकर समशुद्दीन यांच्यामध्ये सतत भांडण होत होते. गुरुवारी दुपारी ३ वाजल्यापासून समशुद्दीन व तरुणीचे भांडण सुरू होते. तिचे दुसऱ्या कोणासोबत तरी प्रेमसंबंध असल्याचा संशय समशुद्दीनला होता. या भांडणातूनच त्याने रागाच्या भरात गावी जात असल्याचे सांगत सायंकाळी ७ च्या सुमारास घरातून निघून गेला. तो रात्री साडे दहा वाजता परत घरी आला. घरी आल्यानंतर तो कोणासोबतही काही बोलत नव्हता.
त्याची विचारपूस केली असता त्याने गावी जाण्याचा विचार असल्याचे सांगितले. त्या दरम्यान तरुणीचा चुलत भाऊ देखील त्यांच्या रूमवर आला. तरुणीचा सख्खा भाऊ व चुलत भाऊ हे रात्री पावणे अकरा वाजता बिल्डींगखाली फिरण्यासाठी गेले होते. त्यावेळी घरामध्ये समशुद्दीन व तरुणी हे दोघेच होते.
मध्यरात्री साधारण १२.२० च्या सुमारास तरुणीचे दोघेही भाऊ घरी आले असता घराचा दरवाजा बंद होता. त्यांनी दरवाजा वाजवला परंतु दरवाजा कोणीही उघडला नाही. परंतु त्यावेळेला त्यांना दरवाजाला चावी अडकवलेली दिसली. त्या चावीने भावाने दरवाजा उघडून घरामध्ये पाहिले असता त्याची बहीण रक्ताच्या थारोळयात गादीवर पडलेली दिसून आली. तिच्या गळ्यामधून मोठ्या प्रमाणात रक्त वाहत होते व जमिनीवर चाकू पडला होता. हे पाहून त्याने समशुद्दीन याला फोन केला असता त्याने फोन उचलला नाही. त्यावरून समशुद्दीन यानेच प्रेयसी तरुणीसोबत झालेल्या वादातून तिचा खून केला असल्याचा संशय तरुणीच्या भावाला आला.
या घटनेची माहिती त्याने पोलिसांना दिली असता काही वेळातच पोलीस घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी अॅम्ब्युलन्स बोलावून तरुणीला उपचारासाठी भाईंदर पश्चिम येथील रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी तरुणीला तपासून तिला मयत घोषित केले.