राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी; महागाई भत्तावाढीचा निर्णय…

राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी; महागाई भत्तावाढीचा निर्णय…

मुंबई : महाराष्ट्रातील लाखो राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. केंद्र सरकारप्रमाणेच राज्यातील कर्मचाऱ्यांचाही महागाई भत्ता लवकरच वाढवला जाणार असून, जुलै महिन्याच्या मध्यावर शासन निर्णय (GR) जारी होण्याची शक्यता आहे.

अखिल भारतीय सेवेतील अधिकाऱ्यांचा महागाई भत्ता नुकताच ५५ टक्क्यांवर नेण्यात आला असून, तो जानेवारी २०२५ पासून लागू राहणार आहे. राज्य शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाने याबाबतचा आदेश आधीच काढला आहे. केंद्र सरकारनेही मार्च २०२५ मध्ये महागाई भत्ता दोन टक्क्यांनी वाढवून ५३ टक्क्यांवरून ५५ टक्के केला होता.

या पार्श्वभूमीवर आता महाराष्ट्रातील राज्य कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता कधी वाढणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. परंपरेनुसार, अखिल भारतीय सेवेतील अधिकाऱ्यांच्या भत्तावाढीनंतर १५-२० दिवसांत राज्य कर्मचाऱ्यांच्या भत्तावाढीचा निर्णय घेतला जातो.

मिळालेल्या माहितीनुसार, जुलै महिन्याच्या १५ ते १६ तारखेदरम्यान राज्य सरकारकडून महागाई भत्तावाढीबाबतचा अधिकृत GR जारी केला जाण्याची शक्यता आहे.

या निर्णयामुळे राज्य कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता ५३ टक्क्यांवरून ५५ टक्क्यांवर जाणार असून, ही वाढही जानेवारी २०२५ पासून लागू राहील. परिणामी, जानेवारी ते जून या सहा महिन्यांचा फरक कर्मचाऱ्यांना एकरकमी मिळण्याची शक्यता आहे.

मध्यप्रदेश, राजस्थान, उत्तर प्रदेश, गुजरात आणि तामिळनाडूसारख्या राज्यांनी केंद्राच्या धर्तीवर आपल्या कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता आधीच वाढवला आहे. आता महाराष्ट्र सरकारही लवकरच निर्णय घेईल, अशी कर्मचारी संघटनांची अपेक्षा आहे.