मंदिर महासंघ व वारकरी संघटना यांचा इशारा ! मूर्तीला जबरदस्तीने रासायनिक लेपन करत असल्याचे प्रकरण !

By: Editor _2

On: Thursday, June 18, 2026 11:45 AM

Google News
Follow Us

पंढरपूर येथील श्री विठ्ठलाच्या मूर्तीला हानी पोहोचल्यास मंदिरे समिती व पुरातत्त्व विभागावर फौजदारी खटला दाखल करू !

      पंढरपूर – पंढरपूर येथील कोट्यवधी हिंदूंचे आराध्यदैवत असलेल्या ‘स्वयंभू’ श्री विठ्ठल-रुक्मिणी मूर्तीवर पुरातत्त्व विभागाद्वारे २३-२४ जून रोजी नियोजित असलेल्या रासायनिक वज्रलेपन प्रक्रियेला  (Epoxy/Silicon) वारकरी संप्रदाय आणि महाराष्ट्र मंदिर महासंघाने कडाडून विरोध केला आहे. कोरोना काळात केलेले लेपन पुढील १० वर्षे टिकेल असा दावा प्रशासनाने केला होता; मात्र अवघ्या ४-५ वर्षांतच मूर्तीला पुन्हा लेपनाची आवश्यकता भासणे हे या रासायनिक प्रक्रियेचे अपयश सिद्ध करते. तब्बल २८ युगे विटेवर सुखरूप उभा असणार्‍या पांडुरंगाच्या मूर्तीच्या पायाला कोरोना टाळेबंदीच्या काळात खड्डा कसा पडला आणि श्री रुक्मिणीमातेचे पाय का खराब झाले, याचे कोणतेही शास्रीय उत्तर अद्याप मंदिर समिती किंवा पुरातत्त्व विभागाला देता आलेले नाही. कृत्रिम रसायनांमुळे पाषाणाचे नैसर्गिक श्वसन रोखले जाऊन मूर्ती आतून ठिसूळ होण्याचा गंभीर धोका असल्याने, वारकरी संत-महंत आणि मूर्तीशास्रज्ञांना विश्वासात न घेता प्रशासनाने एकतर्फी पाऊल उचलल्यास संपूर्ण महाराष्ट्रात जनक्षोभ निर्माण होईल. इतके झाल्यावरही रासायनिक लेपन प्रक्रिया लादण्याचा प्रयत्न झाल्यास आम्ही श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरे समिती आणि पुरातत्व विभाग यांच्या विरोधात न्यायालयात याचिका दाखल करू, असा इशारा महासंघाचे राष्ट्रीय संघटक श्री. सुनील घनवट यांनी दिला पत्रकार परिषदेत दिला आहे. या संदर्भातील निवेदन मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, जिल्हाधिकारी व मंदिरे समिती यांना सादर करण्यात आले आहे.

     या प्रसंगी वारकरी पाईक संघाचे ह.भ.प. रामकृष्ण हनुमंत महाराज वीर, प्रज्ञापुरी ज्ञानपीठ अक्कलकोटचे पीठासीन धर्माधिकारी श्री. प्रसाद पंडित, हिंदुराष्ट्र समन्वय समितीचे जिल्हा संयोजक श्री. चंद्रकांत रमणशेट्टी, महाराष्ट्र मंदिर महासंघाचे श्री. विनोद रसाळ आणि हिंदु जनजागृती समितीचे श्री. राजन बुणगे उपस्थित होते.

१० वर्षांपूर्वी कोल्हापूर येथील श्री महालक्ष्मीदेवीच्या मूर्तीला सेंद्रीय लेपन प्रक्रिया वापरून वज्रलेप,
तर पंढरपूर येथील मूर्तीला रासायनिक लेपनाचा अट्टाहास का ?

     १० वर्षांपूर्वी जेव्हा कोल्हापूर येथील श्री महालक्ष्मीदेवीच्या मूर्तीला केंद्रीय पुरातत्व विभागाचे अधिकारी एम्.आर्. सिंह यांनी २२ जुलै ते ६ ऑगस्ट २०१५ या कालावधीत वज्रलेप केला होता. त्या वेळी श्री महालक्ष्मीदेवीची मूर्ती ज्या पाषाणात घडवली होती त्या पाषाणाची भुकटी यांचे विशिष्ट प्रमाणातील मिश्रण मूर्तीमध्ये सोडण्यात आले होते. या प्रक्रियेत मूर्तीवर बेहडा, दुर्वा यांचा अर्क आणि बिब्ब्याचे तेल वापरून सेंद्रीय मिश्रणाचा वापर करण्यात आला होता. त्या काळी जर श्री महालक्ष्मीदेवीच्या मूर्तीला सेंद्रीय लेपन प्रक्रिया वापरून वज्रलेप करण्यात आला होता, तर आता पंढरपूर येथील श्री विठ्ठलाच्या मूर्तीला रासायनिक लेपनाचा अट्टाहास का ? त्या वेळी करण्यात आलेली कृती जर योग्य असेल, तर आताची कृती अयोग्य आहे, असेच म्हणावे लागेल. अत्यल्प निधीमध्ये होणार्‍या सेंद्रीय लेपनाऐवजी खर्चित रासायनिक आणि अशास्रीय लेपनाचा आग्रह धरून पुरातत्व विभागाचे अधिकारी विलास वहाणे यांना काय साध्य करायचे आहे ? यातून खर्च पडणारा अधिक निधी यांसाठीच तर हे षडयंच रचले जात नाही ना ? अशी शंका घेण्यास निश्चित इथे वाव आहे !

मूर्तीला रासायनिक लेपन करणे चुकीचे ! – श्री स्वामी जगद्गुरु शंकराचार्य पीठ, करवीर

     या संदर्भात करवीर पीठाचे  श्री स्वामी जगद्गुरु शंकराचार्य यांचे मत विचारले असता त्यांनी, ‘‘यथा देहे तथा देवे’ या उक्तीनुसार रासायनिक वज्रलेप केल्यास या पद्धतीने कोणतेही रसायन आपल्या शरीराचा दाह करते, तसेच त्या मूर्तीचा दाह होता. त्यामुळे ‘रासायनिक वज्रलेप करू नये’, असे आमचे स्पष्ट मत आहे.’’ असे स्पष्ट मत व्यक्त केले आहे. त्यामुळे शंकराचार्य यांच्यासारख्या आध्यात्मिक अधिकारी व्यक्तीपेक्षा पुरातत्व विभागाच्या अधिकार्यांना अधिक कळते का ? असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे.

     वारकरी पाईक संघाचे ह.भ.प. रामकृष्ण हनुमंत महाराज वीर म्हणाले, ‘‘गेल्या काही वर्षांत मूर्तीवर ४ ते ५ वेळा रासायनिक प्रयोग करण्यात आले आहेत, ज्याचा परिणाम म्हणून मूर्तीची हानी होत असल्याचे स्पष्ट दिसत आहे. कोल्हापूरच्या श्री महालक्ष्मी देवीच्या मूर्तीवर झालेल्या रासायनिक प्रक्रियेमुळे मूर्तीचे अतोनात नुकसान झाले होते, हा इतिहास डोळ्यांसमोर असताना पंढरपुरात पुन्हा तीच चूक केली जात आहे. कोणत्याही शास्त्रीय प्रक्रियेपूर्वी याचे दिवाणी व फौजदारी उत्तरदायित्व(Legal Liability) निश्चित होणे आवश्यक आहे; त्यामुळे या प्रक्रियेत विठ्ठल किंवा रुक्मिणीमातेच्या मूर्तीला कोणतीही हानी पोहोचल्यास संबंधित अधिकारी आणि मंदिर समितीवर धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी आणि राष्ट्रीय संपत्तीचे नुकसान केल्याप्रकरणी थेट फौजदारी गुन्हे दाखल करण्यासाठी वारकरी व हिंदु संघटना न्यायालयात धाव घेतील.’’

 

For Feedback - puneprahar2018@gmail.com

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Related News

July 6, 2026

July 6, 2026

July 6, 2026

school-holidays-1-jpg-1731597974

July 6, 2026

July 5, 2026

July 4, 2026