पुणे : देशातील सतत बदलणारे व अस्थिर परराष्ट्र धोरण, वाढती सामाजिक अशांतता, बिघडत चाललेला सामाजिक सलोखा आणि वाढता कट्टरतावाद यामुळे भारताची आर्थिक स्थिती चिंताजनक बनत असल्याचा आरोप महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे वरिष्ठ प्रवक्ते गोपाळदादा तिवारी यांनी केला आहे. परकीय गुंतवणूकदार मोठ्या प्रमाणावर भारतातून गुंतवणूक काढून घेत असल्याने देशात “आर्थिक आणीबाणी सदृश परिस्थिती” निर्माण होत असल्याची टीकाही त्यांनी केली.
तिवारी म्हणाले की, अमेरिकेच्या दबावाखाली भारताला अन्यायकारक व्यापारी करार आणि वाढीव आयात कर स्वीकारावे लागत आहेत. त्यामुळे परकीय गुंतवणूकदारांचा भारतावरील विश्वास कमी होत असून, २०२६ मध्ये मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक देशाबाहेर नेली जात असल्याचा दावा त्यांनी केला.
एका आंतरराष्ट्रीय आर्थिक वृत्तपत्रात प्रसिद्ध झालेल्या अहवालाचा संदर्भ देत त्यांनी सांगितले की, सुमारे १ कोटी ८० लाखांची परकीय गुंतवणूक देशाबाहेर गेल्याचा उल्लेख त्या अहवालात करण्यात आला आहे. देशहितासाठी सत्यशोधक आणि निर्भीड पत्रकारिता करणाऱ्या माध्यमांचे काँग्रेसने अभिनंदनही केले.
गेल्या दोन ते तीन वर्षांत भारतीय गुंतवणूकदार आणि भांडवलदारदेखील परदेशात स्थायिक होत असून तेथील नागरिकत्व स्वीकारत असल्याचे तिवारी यांनी नमूद केले. यामुळे भारतीय अर्थव्यवस्थेला मोठा फटका बसत असून, ही बाब देशासाठी अत्यंत नामुष्कीची असल्याचे त्यांनी म्हटले.
या सर्व घडामोडींमुळे देशाच्या परकीय चलनसाठ्यावर ताण निर्माण होत असून, विकासदर घटणे, महागाई वाढणे आणि बेरोजगारी वाढण्याची शक्यता असल्याचा इशाराही त्यांनी दिला. केंद्र सरकार वास्तव परिस्थितीकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप करत, पंतप्रधान नरेंद्र मोदी परदेश दौऱ्यांमध्ये स्वागत आणि सत्कार स्वीकारण्यात व्यस्त असल्याची टीका गोपाळदादा तिवारी यांनी केली.





