देशासाठी मरणे हीच केवळ देशभक्ती नसते तर देशासाठी जगणे आणि आपले कर्तव्य निभावणे ही देखील देशभक्ती आहे. यासाठी जागतिक संकटाच्या काळात काही संकल्प करावे लागतील आणि ते पूर्ण भावनेने पूर्ण करावे लागेल असे आवाहन नरेंद्र मोदी यांनी येथे केले. तेलंगणात सुमारे ९,४०० कोटी रुपयांच्या विविध योजनांचे उद्घाटन आणि भूमिपूजन पंतप्रधान यांच्या हस्ते व्हर्च्युअली करण्यात आले त्यावेळी ते बोलत होते.
गेले दोन महिने मध्य पूर्वेतील युद्धामुळे नवे संकट निर्माण झाले आहे.त्यामुळे इंधनाची टंचाई निर्माण झाली आहे. देशवासियांवर या संकटाची झळ पोहचू नये यासाठी सरकार सतत प्रयत्न करत आहे. नागरिकांवर ओझे पडू नये यासाठी सरकार सारे ओझे स्वत:च्या खांद्यावर घेत आहे. मात्र, पुरवठा साखळीवर सतत संकट असेल तर आम्ही किती उपाय केले तरी अडचणी वाढतच जातात. आता देशाला सर्वतोपरी ठेवत आपल्याला एकजूठ होऊन लढावे लागेल असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यावेळी म्हणाले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी पुढे म्हणाले की या जागतिक संकटाच्या समयी सर्वात मोठा संकल्प पेट्रोल डिझेलचा जपून वापर करणे हा आहे, कारण जर आपण इंधन जपून वापरले जर परकीय चलनाची बचत होईल असेही पंतप्रधान यावेळी म्हणाले. ते पुढे म्हणाले की कोरोना काळात आपण वर्क फ्रॉम होम, ऑनलाईन मिटिंग, वीडियो कॉन्फरन्स आपलेसे केले आणि अनेक उपाय केले. आपल्याला त्यांची सवय देखील झाली. आजच्या काळाची गरज आहे की आपण त्या पद्धतींचा पुन्हा वापर करायला हवा. कारण हे देशाच्या हिताचे असेल आणि त्यांना पुन्हा एकदा प्राथमिकता देणे गरजेचे आहे.
पीएम मोदी म्हणाले की सध्याच्या स्थितीत आपल्या परकीय चलन वाचण्यावर खूप जोर द्यावा लागणार आहे. कारण जगभरात पेट्रोल आणि डिझेल खूप महाग झाले आहे. यासाठी आपली जबाबदारी असेल की आपण इंधन वाचवायला हवे आणि यामुळे पेट्रोल आणि डिझेल खरेदीवर खर्च होणारी विदेशी मुद्रा वाचेल.
पेट्रोल – डिझेल आणि गॅस तसेच खतांचे दर खुप वाढले आहेत. नागरिकांवर ओझे येऊ नये म्हणून सरकार स्वत:च्या खांद्यावर ओझे घेत आहे. मात्र, पुरवठा साखळीवरील संकट कायमच असल्याने देशाला आता एकजूठ होऊन निर्णय घ्यावा लागेल असे पंतप्रधान मोदी यांनी सांगितले. ते पुढे म्हणाले की पेट्रोल आणि डिझेल वाचवण्यासाठी संकल्प करावा लागेल की ज्या शहरात मेट्रो आहे तेथे मेट्रोचा वापर करावा, कारमधून जायचे असेल तर कार पुलिंग करुन एकत्र निघावे.
सामान पाठवण्यासाठी रेल्वेचा वापर करावा. म्हणजे पेट्रोल आणि डिझेलची बचत होईल. परदेशात लग्नानंतर फिरायला जाण्याचे कल्चरल मध्यम वर्गीयात वाढत आहे.संकटात काळाचा विचार करुन आपण परदेशात जाणे एक वर्षांसाठी टाळावे. परकीय चलन वाचवण्यासाठी देशाच्या हिताचा विचार करुन वर्षभर आपण सणासुदीचे सोने खरेदी करु नये. या सर्व प्रयत्नातून आपण परकीय चलन वाचवावे अशी मागणी पंतप्रधान मोदी यांनी केली आहे.





