स्वामी चिंचोलीचा ३०० वर्षांचा ऐतिहासिक वारसा; पेशवेकालीन श्रीराम मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी भाविकांना आवाहन

By: Editor_Pratik

On: Tuesday, August 4, 2026 3:29 AM

Google News
Follow Us

नवसाला पावणारा श्रीराम म्हणून मंदिराची ख्याती; शिखर व कळसाच्या जीर्णोद्धारासाठी सुमारे २५ लाखांचा खर्च अपेक्षित

स्वामी चिंचोली : पुणे-सोलापूर महामार्गावर पुण्यापासून सुमारे दोन तासांच्या अंतरावर असलेले स्वामी चिंचोली येथील इनामदारांचे पेशवेकालीन श्रीराम मंदिर सुमारे ३०० वर्षांचा ऐतिहासिक, धार्मिक आणि सांस्कृतिक वारसा जपत आहे. श्रीमंत बाजीराव पेशवे प्रथम यांच्या काळाशी संबंध सांगणारे हे मंदिर आजही हजारो भाविकांचे श्रद्धास्थान असून, रामनवमीच्या काळात येथे मोठी गर्दी होते.

स्थानिक परंपरेनुसार, सुमारे ३०० वर्षांपूर्वी श्रीमंत बाजीराव पेशवे प्रथम दक्षिणेकडील एका महत्त्वाच्या लढाईसाठी जात असताना त्यांची चिंचोली येथे प. पू. तुकाराम स्वामी यांच्याशी भेट झाली. तुकाराम स्वामींचा आशीर्वाद घेऊन पेशवे लढाईसाठी रवाना झाले आणि त्यात त्यांना विजय मिळाला. त्यानंतर तुकाराम स्वामींच्या आज्ञेनुसार पेशव्यांनी सुमारे १७३० च्या काळात चिंचोली येथे श्रीराम मंदिराची उभारणी केल्याचे सांगितले जाते.

तुकाराम स्वामींच्या प्रभावामुळे पुढे गावाला ‘स्वामींची चिंचोली’ आणि कालांतराने ‘स्वामी चिंचोली’ असे नाव रूढ झाले. मंदिराच्या देखभालीसाठी पेशव्यांनी परिसरातील पाच गावे इनाम म्हणून दिल्याचीही स्थानिक परंपरा आहे. या इनामामुळे पुढील पिढ्यांमध्ये ‘इनामदार’ हे आडनाव रूढ झाल्याचे सांगितले जाते.

मंदिरातील दुर्मिळ मूर्ती ठरतात आकर्षण

या मंदिरात प्रभू श्रीराम, लक्ष्मण आणि सीता यांच्या संगमरवरी मूर्ती आहेत. त्यांच्यासमोर स्वयंभू दास मारुती विराजमान आहे. याशिवाय मंदिरामध्ये दुर्मिळ पंचमुखी शंकराची पिंड तसेच बिभीषणाची संगमरवरी मूर्तीही आहे. या वैशिष्ट्यांमुळे मंदिराचे धार्मिक महत्त्व आणखी वाढले आहे.

अपत्यप्राप्तीसाठी ‘नवसाला पावणारा श्रीराम’ अशी या मंदिराची भाविकांमध्ये विशेष श्रद्धा आहे. अनेक भाविकांना याची प्रचिती आल्याचे सांगितले जाते. त्यामुळे रामनवमीच्या दिवशी रामजन्म सोहळ्यानंतर नवविवाहित महिलांकडून ‘रामबाळ’ ओटीत घेण्याची परंपरा असून, त्यासाठी स्वतंत्र रांगही लावली जाते.

मंदिराच्या जीर्णोद्धाराचे काम हाती

यंदा श्रीराम जानकी चॅरिटेबल ट्रस्ट आणि इनामदार कुटुंबीयांच्या वतीने मंदिराच्या जीर्णोद्धाराचे काम हाती घेण्यात आले आहे. पहिल्या टप्प्यात मंदिराचे शिखर आणि कळस यांचा जीर्णोद्धार करण्यात येणार असून, त्यासाठी सुमारे २५ लाख रुपये खर्च अपेक्षित आहे.

या ऐतिहासिक आणि धार्मिक वारशाच्या जतनासाठी भाविकांनी यथाशक्ती आर्थिक देणगी देऊन सहकार्य करावे, असे आवाहन ट्रस्ट आणि इनामदार कुटुंबीयांनी केले आहे. ‘कोणतीही रक्कम छोटी नसते, सद्भावना महत्त्वाची असते’, या भावनेतून भाविकांनी या पवित्र कार्यात सहभागी व्हावे, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.

रामनवमीचा उत्सव उत्साहात

दरवर्षीप्रमाणे यंदाही मंदिरात श्रीरामनवमीचा उत्सव मोठ्या भक्तिभावात साजरा करण्यात आला. गुढीपाडव्याच्या दिवशी रामाचे नवरात्र बसवून उत्सवाला सुरुवात झाली. अष्टमीच्या दिवशी सकाळी समर्थ संप्रदायाच्या परंपरेनुसार भिक्षेची फेरी काढण्यात आली. रात्री छबिना काढण्यात आला. गावाच्या वेशीपर्यंत निघालेल्या या फेरीमध्ये श्रीरामाच्या विविध आरत्या आणि पदे उत्साहात गायली गेली.

रामनवमीच्या दिवशी पवमान अभिषेक, रुद्र आदी धार्मिक विधींनी श्रीरामाच्या पूजेला प्रारंभ झाला. त्यानंतर ह.भ.प. सौ. मोहना नातू यांनी नारदीय कीर्तन सादर केले. कीर्तनानंतर पारंपरिक पद्धतीने रामजन्म सोहळा पार पडला. श्रीरामाच्या दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती.

रामनवमीच्या रात्री परंपरेनुसार श्रीरामाची पालखीतून मिरवणूक काढण्यात आली. यावेळी ग्रामस्थांनी विविध भक्तिगीते आणि पदे सादर केली. दुसऱ्या दिवशी दशमीला सकाळी मंदिरात ‘प्रसन्न राघवा’ची पूजा करून उत्सवाची सांगता करण्यात आली.

रामजन्म सोहळ्यावेळी राष्ट्रसंत व समर्थ भक्त मोहनबुवा रामदासी तसेच माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांची उपस्थिती विशेष ठरली.

यंदाच्या उत्सवात इनामदार कुटुंबीय आणि श्रीराम जानकी चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने सुमारे ५ हजार भाविकांना उपवासाच्या खिचडीचा प्रसाद, तसेच सुमारे पाच हजार भाविकांना पिण्याच्या पाण्याचे वाटप करण्यात आले.

मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी सहकार्य किंवा अधिक माहितीसाठी भाविकांनी ९८५०२८६८८० किंवा ७०३००३५१२३ या क्रमांकांवर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

For Feedback - puneprahar2018@gmail.com

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Related News

August 3, 2026

August 3, 2026

August 3, 2026

August 2, 2026

August 2, 2026

August 2, 2026