प्रतिनिधी – मानस, भोपाळ : ट्विशा शर्मा मृत्यू प्रकरणात आता नवे खुलासे समोर येत आहेत. ट्विशाच्या संशयास्पद मृत्यूनंतर तिची सासू आणि माजी जिल्हा न्यायाधीश गिरीबाला सिंह यांनी विविध वरिष्ठ अधिकारी, कायदे क्षेत्रातील मान्यवर आणि वैयक्तिक ओळखीतील सुमारे ४५ जणांना फोन केल्याची माहिती तपासात समोर आली आहे. मात्र हे सर्व फोन केवळ सांत्वन आणि मदतीसाठी केल्याचा दावा गिरीबाला सिंह यांनी केला आहे.
ट्विशाच्या मृत्यूनंतर फोनाफोनी
१२ मे रोजी ट्विशा शर्मा ही भोपाळमधील कटारा हिल्स परिसरातील सासरच्या घरी गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आली होती. या घटनेनंतर गिरीबाला सिंह यांनी अनेक लोकांशी संपर्क साधल्याचे कॉल डिटेल रेकॉर्डमधून स्पष्ट झाले आहे. या कॉल्समध्ये वरिष्ठ नोकरशहा, कायदेतज्ज्ञ तसेच काही वैयक्तिक परिचितांचाही समावेश असल्याचे सांगितले जात आहे.
याबाबत स्पष्टीकरण देताना गिरीबाला सिंह म्हणाल्या, “अशा कठीण परिस्थितीत मी माझ्या सहकाऱ्यांशी आणि ओळखीच्या लोकांशी संपर्क साधला. त्यामागे कोणताही वेगळा हेतू नव्हता.”
फरार समर्थ सिंह आईच्या संपर्कात?
या प्रकरणातील मुख्य आरोपी आणि ट्विशाचा पती समर्थ सिंह गेल्या अनेक दिवसांपासून फरार आहे. पोलिसांच्या तपासात तो बेपत्ता असतानाही आपल्या आईच्या संपर्कात असल्याचे समोर आले आहे. कॉल रेकॉर्डनुसार १३ मे रोजी समर्थ सिंहने आपल्या आईला दोन वेळा फोन केल्याचे सांगितले जात आहे.
या फोन रेकॉर्ड्सची सध्या पोलिसांकडून सखोल चौकशी सुरू आहे. समर्थ सिंहचा शोध घेण्यासाठी मध्य प्रदेशासह इतर राज्यांतही पोलिसांची पथके रवाना करण्यात आली आहेत.
हुंडाबळीचा आरोप
ट्विशाच्या कुटुंबीयांनी तिच्या पतीवर आणि सासरच्या मंडळींवर हुंड्यासाठी छळ केल्याचा गंभीर आरोप केला आहे. तसेच मानसिक त्रासामुळे तिला आत्महत्येस प्रवृत्त करण्यात आल्याचेही त्यांनी म्हटले आहे.
दुसरीकडे, सिंह कुटुंबीयांनी ट्विशाला अमली पदार्थांचे व्यसन असल्याचा दावा केला आहे. त्यामुळे या प्रकरणात विविध दावे-प्रतिदावे समोर येत असून तपास अधिक गुंतागुंतीचा बनला आहे.
आरोपीच्या शोधासाठी पोलिसांचे प्रयत्न
समर्थ सिंहचा शोध घेण्यासाठी पोलिसांकडून विविध ठिकाणी छापेमारी सुरू आहे. आरोपीबाबत माहिती देणाऱ्यास प्रशासनाने ३० हजार रुपयांचे बक्षीस जाहीर केले आहे. या प्रकरणामुळे भोपाळमध्ये मोठी खळबळ उडाली असून समाजातही संताप व्यक्त केला जात आहे.





