प्रतिनिधी – मानस, सांगली : महाविद्यालयाच्या पहिल्या वर्षाचा शेवटचा दिवस आनंदात साजरा करण्यासाठी घरातून निघालेल्या १९ वर्षीय तरुणावर काळाने घाला घातला. तुंग गावाजवळ दुचाकी दुभाजकाला जोरात धडकल्याने ऋषिकेश दीपक माळी (रा. पोद्दार स्कूलजवळ, सांगली) याचा जागीच मृत्यू झाला. या दुर्घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
मित्रांसमोरच घडला अपघात
ऋषिकेश हा ईश्वरपूर येथील महाविद्यालयात पदवीच्या पहिल्या वर्षात शिक्षण घेत होता. कॉलेजचा शेवटचा दिवस असल्याने तो सकाळी आपल्या अलिशान दुचाकीवरून महाविद्यालयाकडे निघाला होता. त्याचे दोन मित्रही मागून येत होते.
सकाळी सुमारे नऊच्या सुमारास तुंग गावाजवळील रस्त्यावरून जात असताना त्याच्या दुचाकीचा वेग जास्त होता. यावेळी समोरून एक दुचाकी येत होती. समोरील वाहन आणि दुभाजकाच्या मधून पुढे जाता येईल, असा अंदाज घेत ऋषिकेशने दुचाकी वेगात पुढे नेली. मात्र अंदाज चुकल्याने दुचाकी थेट दुभाजकावर आदळली.
हेल्मेट फुटले, जागीच मृत्यू
अपघात इतका भीषण होता की, ऋषिकेशने घातलेले हेल्मेट फुटले आणि गंभीर दुखापतीमुळे त्याचा जागीच मृत्यू झाला. हा थरारक अपघात पाहून परिसरातील नागरिक हादरले. काही क्षणांतच घटनास्थळी मोठी गर्दी जमली.
मागून येणारे मित्र घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी तात्काळ ‘१०८’ रुग्णवाहिकेला माहिती दिली. मात्र वैद्यकीय पथक पोहोचण्यापूर्वीच ऋषिकेशचा मृत्यू झाला होता.
पोलिसांकडून तपास सुरू
घटनेची माहिती मिळताच सांगली ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. उपनिरीक्षक इस्माईल तांबोळी यांनी पंचनामा करून माहिती घेतली. या प्रकरणाची नोंद सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.





