भारताच्या संरक्षणासाठी मुंबईत १७ मे रोजी ‘श्री राजमातंगी महायज्ञ

By: Editor _2

On: Friday, May 15, 2026 11:12 AM

Google News
Follow Us

मुंबई : जगावर सध्या तिसऱ्या महायुद्धाचे काळे ढग दाटले असताना, केवळ राजकीय किंवा बौद्धिक स्तरावरील प्रयत्न पुरेसे नसून राष्ट्राला आध्यात्मिक अधिष्ठानाची मोठी गरज आहे. याच उदात्त हेतूने, भारताला अभेद्य आध्यात्मिक संरक्षककवच लाभावे आणि देशाची सर्वांगीण प्रगती होऊन पुन्हा एकदा ‘रामराज्या’चा उदय व्हावा, या संकल्पपूर्तीसाठी सनातन संस्थेच्या वतीने मुंबईत ‘श्री राजमातंगी महायज्ञा’चे आयोजन करण्यात आले आहे. येत्या रविवारी, १७ मे २०२६ रोजी प्रभादेवी येथील श्री सिद्धिविनायक मंदिराच्या पाठीमागे असलेल्या नर्दुल्ला टँक मैदानावर दुपारी ३.३० ते सायं. ७.३० या वेळेत हा यज्ञ सोहळा अत्यंत मंगलमय वातावरणात संपन्न होणार आहे, अशी माहिती सनातन संस्थेचे प्रवक्ता श्री. अभय वर्तक यांनी मुंबई मराठी पत्रकार संघात आयोजित पत्रकार परिषदेत दिली. या वेळी संस्थेचे राष्ट्रीय प्रवक्ता श्री. चेतन राजहंस, पुरोहित अन् ज्योतिर्विद श्री. श्रेयस पिसोळकर आणि महाराष्ट्र मंदिर महासंघाचे नवी मुंबई समन्वयक श्री. कैलास पाटील उपस्थित होते. हा महायज्ञ केवळ धार्मिक विधी नसून तो राष्ट्ररक्षणाचा एक आध्यात्मिक लढा असल्याचे या वेळी अधोरेखित करण्यात आले.

या यज्ञाचे आध्यात्मिक महत्त्व विशद करताना श्री. अभय वर्तक म्हणाले की, आदिशक्ती देवी सतीच्या क्रोधातून प्रकट झालेल्या ‘दशमहाविद्यां’मध्ये मातंगीदेवीचे स्थान अनन्यसाधारण आहे. देवी मातंगी ही आदिशक्तीची ‘प्रधानमंत्री’ म्हणजेच प्रमुख सल्लागार मानली जाते. शत्रूवर विजय मिळवण्यासाठी आणि प्रतिकूल परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी या देवीची उपासना फलदायी ठरते. ऐतिहासिक संदर्भांचा दाखला देत त्यांनी सांगितले की, त्रेतायुगात प्रभू श्रीरामाच्या अवताराच्या वेळीही राजमातंगी देवीचे तत्त्व कार्यरत होते, ज्यामुळे आदर्श रामराज्य स्थापन होऊ शकले. आजच्या काळातही तशाच दैवी शक्तीच्या आशीर्वादाने भारताचे संरक्षण व्हावे, हा या यज्ञामागील मुख्य उद्देश आहे.

या महायज्ञाचे सर्वात मोठे आकर्षण म्हणजे १ हजार वर्षांपूर्वी आक्रमक महंमद गझनीने भग्न केलेल्या सोरटी सोमनाथ ज्योतिर्लिंगाच्या दिव्य अंशांचे दर्शन ! इतिहासाची साक्ष देणारे हे पवित्र अवशेष याठिकाणी दर्शनासाठी ठेवले जाणार असून भाविकांसाठी ही एक दुर्मिळ संधी असणार आहे असे श्री. चेतन राजहंस म्हणाले. यज्ञाची सुरुवात महासंकल्प, श्री गणेश आवाहन आणि पुण्याहवाचन होणार असून, श्री राजमातंगी देवीच्या मूलमंत्रांनी यज्ञामध्ये आहुती अर्पण केल्या जातील. यज्ञाचे पौरोहित्य इरोड, तामिळनाडू येथील शिवागम विद्यानिधी आगमाचार्य श्री. अरुणकुमार गुरुमूर्ती करतील तर शिवाचार्य श्री. गुरुमूर्ती हे यज्ञाचे मुख्य आचार्य असतील, असे पुरोहित अन् ज्योतिर्विद श्री. श्रेयस पिसोळकर म्हणाले. या यज्ञाला मुंबई, ठाणे, रायगड आणि पालघर जिल्हयातील अनेक मंदिरांचे विश्वस्त आणि पुजारी सहभागी होणार आहेत, अशी माहिती महाराष्ट्र मंदिर महासंघाचे नवी मुंबई समन्वयक श्री. कैलास पाटील यांनी दिली.

सनातन संस्थेने आतापर्यंत ७५० हून अधिक यज्ञ-अनुष्ठाने केली आहेत. या यज्ञ सोहळ्याला विविध क्षेत्रांतील मान्यवर, संत-महंत, राज्य सरकारमधील मंत्री, हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे पदाधिकारी, विचारवंत, वकील आणि उद्योजकांसह सुमारे ५ हजार भाविक उपस्थित राहतील. सनातन संस्थेचे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांनी ज्या मुंबापुरीतून धर्मकार्याचा श्रीगणेशा केला, त्याच नगरीत होणारा हा महायज्ञ राष्ट्रउभारणीच्या दिशेने एक ऐतिहासिक पाऊल ठरेल, असा विश्वास संस्थेच्या वतीने व्यक्त करण्यात आला आहे. सर्व धर्मप्रेमी हिंदूंनी सहकुटुंब या सोहळ्याला उपस्थित राहावे, असे आवाहन श्री. अभय वर्तक यांनी केले आहे

For Feedback - puneprahar2018@gmail.com

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Related News

May 15, 2026

May 15, 2026

May 15, 2026

May 15, 2026

May 15, 2026

May 15, 2026