पुणे – रंगपंचमी आणि आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत मोठ्या संख्येने महिलांनी ‘खडकवासला जलाशय रक्षण अभियान’ात सक्रिय सहभाग नोंदविला. हिंदु जनजागृती समितीच्या पुढाकाराने राबविण्यात येणाऱ्या या उपक्रमात रविवारी सुट्टीचा दिवस असतानाही महिलांनी मोठ्या उत्साहाने उपस्थित राहून जलाशय रक्षणाचे कार्य केले.
रंगपंचमीच्या दिवशी जलाशयात रंग, कचरा किंवा इतर प्रदूषक पदार्थ टाकले जाऊ नयेत, यासाठी महिलांनी नागरिकांचे प्रबोधन केले. गेल्या २४ वर्षांपासून सातत्याने सुरू असलेले ‘खडकवासला जलाशय रक्षण अभियान’ यंदाही यशस्वीरीत्या पार पडले. या मोहिमेला शासन आणि प्रशासनाचेही सहकार्य लाभले. पोलीस, स्थानिक प्रशासन तसेच विविध विभागांनी आवश्यक ती मदत केली. पर्यावरणाबद्दल जागरूक असलेल्या अनेक नागरिकांनीही स्वयंस्फूर्तीने सहभाग नोंदवून या अभियानाला पाठबळ दिले.
सकाळी ८ वाजता भगवान श्रीकृष्णाच्या प्रतिमेचे पूजन आणि भावपूर्ण आरती करून या मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला. पुणे शहर, पिंपरी-चिंचवड, सासवड, हडपसर, भोर आणि आळंदे वाडी आदी भागांमधून मोठ्या संख्येने नागरिक आणि हिंदुत्वनिष्ठ कार्यकर्ते या मोहिमेत सहभागी झाले होते. या उपक्रमात अधिवक्ता, संगणक अभियंते, उद्योजक आणि पत्रकारांनीही सक्रिय सहभाग घेतला.
या अभियानादरम्यान उपस्थित मान्यवरांनी समितीच्या कार्याचे कौतुक केले. “पाण्याची नासाडी आणि प्रदूषण रोखण्यासाठी समितीचे कार्यकर्ते ज्या जिद्दीने जलाशयाभोवती उभे राहतात, ते कौतुकास्पद आहे. महाराष्ट्रातील नद्यांना प्रदूषणमुक्त करण्यासाठी अशी अभियाने लोकचळवळ बनणे आवश्यक आहे,” असे मत त्यांनी व्यक्त केले.
मोहिमेच्या शेवटी हिंदु जनजागृती समितीचे श्री. पराग गोखले यांनी सर्व सहभागी नागरिकांचे आणि सहकार्य करणाऱ्या यंत्रणांचे समितीच्या वतीने मनःपूर्वक आभार मानले.









