राज्यातील शिक्षकांसाठी आनंदाची बातमी! वर्षानुवर्षांच्या तक्रारींवर सरकारची दखल; कोणता महत्त्वाचा बदल होणार?

By: Editor_Pratik

On: Friday, November 21, 2025 2:40 PM

Google News
Follow Us

नाशिक: ज्ञानदानाव्यतिरिक्त अवांतर कामांमध्ये शिक्षक भरडले जाऊन ज्ञानदानाच्या मुख्य कार्यावर परिणाम होतो. याबाबत वर्षानुवर्षे शिक्षकांच्या तक्रारी आहेत. त्यामुळे आता शालेय स्तरावरील पंधराऐवजी चार प्रमुख समित्याच कार्यरत राहतील. त्याद्वारे वाचणारा वेळ शिक्षकांना ज्ञानदानासाठी खर्च करता येईल, असे प्रतिपादन शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी गुरुवारी येथे केले.

जिल्हा परिषदच्या शिक्षण विभागातर्फे परशुराम साईखेडकर नाट्यगृहात आयोजित गुणवंत शिक्षक पुरस्कार वितरण समारंभात ते बोलत होते. यावेळी अन्न व औषध प्रशासन तथा विशेष सहाय्यमंत्री नरहरी झिरवाळ, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ओमकार पवार, शिक्षणाधिकारी सरोज जगताप, शिक्षणाधिकारी डॉ. प्रशांत दिग्रसकर, भास्कर कनोज, शिवसेना (शिंदे गट) महानगरप्रमुख प्रवीण तिदमे, संपर्कप्रमुख विलास शिंदे, राजू लवटे, भाऊलाल तांबडे आदी उपस्थित होते.

मंत्री भुसे म्हणाले, की केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्यासोबत झालेल्या बैठकीत छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास देशपातळीवर सर्व शाळांमधून विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तकांतून ज्ञात होण्यासाठी तत्त्वतः मान्यता देण्यात आली आहे. राज्यात सर्व माध्यमांच्या शाळांमधून मराठी भाषा शिकविणे व राष्ट्रगीतानंतर ‘गर्जा महाराष्ट्र माझा’ हे राज्यगीत गायले जाणे बंधनकारक केले असल्याचेही मंत्री भुसे यांनी सांगितले.

शाळेत विद्यार्थांसाठी शिष्यवृत्ती परीक्षा पाचवी व आठवीसह चौथी व सातवीसाठीही सुरू करण्यात येणार असल्याचेही नमूद केले. जिल्हा परिषदेचे सीईओ पवार, पुरस्कारार्थी शिक्षक रमाकांत जगताप, वंदना भामरे आदींनीही मनोगत व्यक्त केले. महापालिकेचे पुरस्कार्थी शिक्षक भास्कर साळवे यांनी कवी वामनदादा कर्डक यांची कविता सादर केली. शिक्षणाधिकारी कनोज यांनी प्रास्ताविक केले.

झिरवाळांचे भाषण ऐकण्यासाठी शिक्षक नक्की थांबतील या विश्वासाने माइकचा ताबा घेतल्याचे मंत्री भुसेंनी मिश्कीलपणे सांगितले. त्यानंतर मंत्री झिरवाळ यांनी आपल्या शैलीत मुद्दे मांडताना सभागृहात हास्याचे फवारे उडविले. ‘मी आमदार झालो, मंत्रीही झालो, पण माझे गाव मात्र तसेच आहे. गाव काही बदलले नाही,’ असे झिरवाळ यांनी त्यांच्या शैलीत सांगताच सभागृहात हशा पिकला. मात्र, माझे गाव आता शंभर टक्के बागायती झाल्याची पुष्टीही त्यांनी जोडली. माजी विद्यार्थ्यांच्या मेळाव्यांद्वारे शाळेला भरीव मदत मिळू शकेल, असेही ते म्हणाले.

स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये विविध स्तरांवर चांगले शैक्षणिक काम करणाऱ्यांसाठी मंत्री भुसे यांनी प्रोत्साहनपर पारितोषिकांची घोषणा केली. त्यानुसार प्रथम क्रमांकासाठी पाच कोटी रुपये, द्वितीय क्रमांकासाठी तीन कोटी रुपये, तर तृतीय क्रमांकासाठी दोन कोटी रुपयांचे पारितोषिक देण्यात येणार आहे.
For Feedback - puneprahar2018@gmail.com

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Related News

April 21, 2026

Malabar मलबार

April 20, 2026

April 18, 2026

April 17, 2026

April 16, 2026

April 16, 2026