🔸 महाराष्ट्रातील शालेय विद्यार्थ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. राज्यातील सर्वच शाळांना येत्या 8 आणि 9 जुलै 2025 रोजी दोन दिवसांची सुट्टी मिळणार आहे. ही सुट्टी अचानक मिळालेली नसून यामागे एक मोठं आणि दीर्घकालीन कारण दडलेलं आहे. राज्य सरकारच्या विरोधात पुकारण्यात आलेलं शाळा बंद आंदोलन हे या दोन दिवसांच्या सुट्टीमागचं मुख्य कारण आहे. या आंदोलनाला महाराष्ट्र राज्य मुख्याध्यापक महामंडळ, संयुक्त मुख्याध्यापक महामंडळ, तसेच राज्यातील विविध शिक्षक संघटनांनी बिनशर्त पाठिंबा दिला आहे.
🔸 त्यामुळे हे आंदोलन अधिक व्यापक आणि प्रभावी ठरण्याची शक्यता आहे. खरंतर राज्यातील अनुदानित आणि अंशतः अनुदानित शाळांमधील शिक्षक आणि कर्मचारी आपल्या प्रलंबित मागण्यांसाठी पुन्हा एकदा रस्त्यावर उतरणार आहेत. त्यामुळे 8 आणि 9 जुलै रोजी राज्यातील हजारो शिक्षक मुंबईच्या आझाद मैदानावर आंदोलन करणार आहेत. याच कारणांमुळे शाळा बंद असणार आहेत. गेल्या वर्षी 1 ऑगस्ट 2024 पासून सुरू झालेल्या 75 दिवसांच्या सलग आंदोलनात शिक्षकांनी काही अनुदान मंजूर करण्याची मागणी केली होती.
🔸 त्याचा परिणाम म्हणून 10 ऑक्टोबर 2024 रोजी झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली या मागणीला मंजुरी मिळाल्याचे जाहीर करण्यात आले होते. मात्र 14 ऑक्टोबर 2024 रोजी सरकारकडून काढण्यात आलेल्या शासन निर्णयामध्ये (GR) प्रत्यक्ष निधीची कोणतीही तरतूद करण्यात आलेली नव्हती. त्यामुळे अजूनही शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या मागण्यांकडे सरकारने गंभीरतेने लक्ष दिलेले नाही, असा आरोप शिक्षक संघटनांकडून करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्वच शाळांना 8 आणि 9 जुलै रोजी बंद ठेवण्याचा निर्णय घेतला गेला आहे.