Operation Sindoor : मोदींसमोर जगही थक्क, पाकिस्तानातील नेमक्या त्याच 9 ठिकाणांवर हल्ला का? नेमका मास्टर प्लान काय?
जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे 22 एप्रिल रोजी दहशतवादी हल्ला झाला होता. त्यामध्ये 26 पर्यटकांचा मृत्यू झाला होता. पाकिस्तानातील दहशतवाद्यांनी पर्यटकांना लक्ष्य केले होते. भारताने पाकिस्तानला चोख प्रत्यतुत्तर दिले पाहिजे अशी मागणी केली जात होती. आज 7 मे रोजी म्हणजेच दहशतवादी हल्ल्याच्या 14 दिवसांनंतर पाकिस्तानला प्रत्युत्तर दिले आहे. भारताने पाकिस्तानातील 9 ठिकाणी एअर स्ट्राईक केला आहे. पण हीच 9 ठिकाणे का निवडण्यात आली? असा प्रश्न सर्वांना पडला आहे. चला जाणून घेऊया त्या मागील कारण…
भारताने पाकिस्तान अधिकृत जम्मू-कश्मीरमधील मुजफ्फराबाद, कोटली, गुलपुर, बिंबर आणि सियालकोट, चक अमरू, मुरीदके, बहावलपूर अशा 9 ठिकाणी एअर स्ट्राईक केला. पण हीच ९ ठिकाणे का निवडी असा प्रश्न सर्वांना पडला आहे.
सियालकोट
सियालकोट हा भारत आणि पाकिस्तान सिमेवरील दहशतीचा अड्डा आहे. या भागाला दहशतवादी हालचालींचे केंद्र असे म्हटले जाते. हे ठिकाण भारतातील जम्मू सीमेच्या जवळ आहे. त्यामुळे शस्त्र व अतिरेक्यांचे प्रवेशद्वार म्हणून महत्त्वाचे मानले जाते. वाचा: भारताचा सर्वात मोठा शत्रू दहशतवादी मसूद अजहर मारला गेला का? हल्ल्यात जैशचे टॉप कमांडर ठार
चक अमरू
दहशतवाद्यांना पंजाबमधून भारतात प्रवेशाचा मार्ग चक अमरू येथून आहे. शस्त्र व दहशतवादी भारतात पाठवण्यासाठी वापरले जाणारे हे ठिकाण आहे. तसेच ड्रोन व स्मगलिंगद्वारे भारतात प्रवेशासाठी याचा वापर होत असल्याची माहिती होती. त्यामुळे एअर स्ट्राईकसाठी हे ठिकाण निवडण्यात आले होते.
भिंबर
दहशतवादी घुसखोरीसाठी भिंबर हे ठिकाण महत्त्वाचे आहे. भारतीय लष्कराच्या ऑपरेशन्समध्ये याठिकाणी अनेक हालचाली टिपल्या गेल्या होत्या. त्यामुळे दहशतवाद्यांच्या या ठिकाणावर हल्ला करण्याचा निर्णय घेतला असल्याचे म्हटले जाते.
गुलपूर
गुलपूर हे दहशतवादी प्रक्षेपण स्थळ म्हणून ओळखले जाते. हे ठिकाण भारतात शस्त्रास्त्रे व अतिरेकी घुसवण्यासाठी वापरले जाते. गुप्तचर अहवालानुसार, याठिकाणी दहशतवाद्यांना LOC पार करण्यासाठी सज्ज ठेवले जाते.
कोटली
कोटली येथे दहशतवादी प्रशिक्षण शिबिर घेतले जाते. या भागाला नवे दहशतवादी घडवले जाणारा कारखाना असे ही म्हटले जाते. जैश, लष्कर व हिजबुल यांच्या संयुक्त कारवायांसाठी या ठिकाणाचा वापर करण्यात आला आहे. जंगल युद्धाचे प्रशिक्षण इथे दिले जाते. तसेच LOC जवळ वसलेले प्रशिक्षण केंद्र आहे.
मुजफ्फराबाद
POK मधील दहशतवादाचे केंद्र म्हणून मुजफ्फराबाद ओळखले जाते. याठिकाणी हिजबुलच्या कॅडरला प्रशिक्षण दिले जाते. हा घुसखोरीसाठी महत्त्वाचा मार्ग मानला जातो.
मुरीदके
मुरीदके येथे लष्कर-ए-तैयबाचे मुख्यालय आहे. येथेच 26/11च्या झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा कट रचला गेला होता. हे एक जमात-उद-दवाच्या नावाखाली चालणारे कट्टरवादी केंद्र आहे. लष्कर-ए-तैयबा इथून आर्थिक, धार्मिक आणि शस्त्रप्रशिक्षण मोहीमा चालवते. भारतात मोठ्या घातपाताच्या योजना याच ठिकाणाहून आखल्या जातात.
बहावलपूर
बहावलपूर हे मसूद अझहरचा गड आहे. तसेच जैश-ए-मोहम्मदचे सर्वात सक्रिय तळ आहे. पठानकोट व पुलवामा हल्ल्याचे सूत्रधार इथून सक्रिय होते. इथे मदरसे, प्रशिक्षण केंद्रे आणि भरती मोहीम मोठ्या प्रमाणावर चालते.