पुणे : प्रेमविवाह करून नव्या आयुष्याची स्वप्ने पाहणाऱ्या 20 वर्षीय तरुणीने कथित हुंड्याच्या छळाला कंटाळून टोकाचे पाऊल उचलल्याची धक्कादायक घटना पुण्यात उघडकीस आली आहे. विवाहानंतर पती आणि सासरच्या मंडळींकडून होत असलेल्या मानसिक त्रासामुळे तरुणीने फिनेल प्राशन करून आत्महत्या केल्याचा आरोप करण्यात आला आहे.
या प्रकरणी आंबेगाव पोलिस ठाण्यात पती, सासू आणि नणंद यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मृत तरुणीच्या आईने दिलेल्या फिर्यादीनुसार, आरोपींनी वारंवार माहेरहून सोन्याचे दागिने आणण्याची मागणी करत तिचा छळ केला होता.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी पती अजित दशरथ पवार (वय 25) हा मूळचा लातूर जिल्ह्यातील असून सध्या पुण्यात वास्तव्यास आहे. वर्षभरापूर्वी त्याचा आणि संबंधित तरुणीचा प्रेमविवाह झाला होता. मात्र लग्नानंतर काही काळातच हुंड्याच्या मागणीवरून वाद सुरू झाल्याचे तपासात समोर आले आहे.
फिर्यादीत नमूद केल्याप्रमाणे, पतीसह सासू अनुसया दशरथ पवार (वय 55) आणि नणंद अलका लहू जाधव (वय 30) यांनीही तरुणीचा मानसिक छळ केला. सततच्या त्रासामुळे नैराश्यात गेलेल्या तरुणीने फिनेल पिऊन आत्महत्या केल्याचा आरोप करण्यात आला आहे.
या घटनेनंतर मृत तरुणीच्या आईने पोलिसांकडे धाव घेत तक्रार दाखल केली. त्यानुसार आंबेगाव पोलिसांनी तिघांविरोधात आत्महत्येस प्रवृत्त करणे आणि हुंडाबळी प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा नोंदवला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक डोईफोडे करत आहेत.





