उजनी कालव्यात पोहण्यासाठी गेलेल्या राजस्थानातील दोन कारागिरांचा बुडून मृत्यू; मोहोळ तालुक्यात खळबळ

By: Editor_Manas

On: Monday, May 18, 2026 5:11 PM

Google News
Follow Us

प्रतिनिधी – मानस : मोहोळ तालुक्यातील ढोकबाभूळगाव येथे उजनीच्या डाव्या कालव्यात पोहण्यासाठी गेलेल्या राजस्थानातील दोन कारागिरांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. शनिवारी दुपारी कालव्यात पोहताना दोघेही पाण्याच्या प्रवाहात वाहून गेले होते. अखेर रविवारी सकाळी त्यांचे मृतदेह कालव्याच्या पाण्यावर तरंगताना आढळून आले.

शशिकांत रोहिदास चोपडा आणि बाबूलाल हेमराज चोपडा (दोघे रा. खेतडा, राजस्थान) अशी मृतांची नावे आहेत. हे दोघे फरशी बसविण्याचे काम करत असून, ढोकबाभूळगाव परिसरात कामानिमित्त वास्तव्यास होते.

मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी दुपारी अडीचच्या सुमारास दोघे आपल्या इतर साथीदारांसह चौधरी वस्तीजवळील उजनी डाव्या कालव्यात पोहण्यासाठी गेले होते. मात्र कालव्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने दोघेही पाण्यात बुडाले आणि प्रवाहात वाहून गेले.

घटनेची माहिती मिळताच पोलिस आणि स्थानिक ग्रामस्थांनी शोधमोहीम सुरू केली. शनिवारी रात्री उशिरापर्यंत त्यांचा शोध लागला नव्हता. रविवारी सकाळी जीवरक्षक पथक घटनास्थळी पोहोचण्यापूर्वीच नागरिकांना पाण्यावर तरंगणारे मृतदेह दिसून आले.

स्थानिक ग्रामस्थ, पोलिस पाटील आणि पोलिस प्रशासनाच्या मदतीने दोन्ही मृतदेह पाण्याबाहेर काढण्यात आले. त्यानंतर उत्तरीय तपासणीसाठी मृतदेह मोहोळ ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आले. पुढील प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर मृतदेह त्यांच्या मूळ गावी रवाना करण्यात आले.

For Feedback - puneprahar2018@gmail.com

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now