समृद्धी महामार्गावर जालना जिल्ह्यातील कडवंची शिवारात भीषण अपघात घडून ५ ते ६ महिला मजुरांचा जागीच मृत्यू झाला. भरधाव वेगाने धावणाऱ्या ट्रकने कामात गुंतलेल्या मजूर महिलांना चिरडल्याने हा हृदयद्रावक प्रकार घडला.
मिळालेल्या माहितीनुसार, नागपूरहून मुंबईकडे जाणारा ट्रक समृद्धी महामार्गावरून वेगात जात होता. त्याचवेळी रस्त्यालगत काम करत असलेल्या मजूर महिलांना ट्रकने जोरदार धडक दिली. या धडकेत ५ ते ६ महिलांचा जागीच मृत्यू झाला असल्याची प्राथमिक माहिती आहे.
घटनेची माहिती मिळताच पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. मृतांची ओळख पटवण्याचे काम सुरू असून अपघाताचे नेमके कारण शोधण्यासाठी सखोल चौकशी केली जात आहे. काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती; मात्र पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणत वाहतूक सुरळीत केली.
या दुर्घटनेनंतर मृत मजूर महिलांच्या कुटुंबीयांना तातडीने आर्थिक मदत देण्याची मागणी होत आहे. समृद्धी महामार्गावर वेगामुळे होणाऱ्या अपघातांचा धोका वारंवार समोर येत असल्याने सुरक्षेबाबत पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.





