हनी ट्रॅप प्रकरणात सुमारे ५० मंत्री व अधिकारी अडकल्याचा आरोप; प्रफुल लोढाने किमान २०० कोटींची वसूली केली – विजय वडेट्टीवार यांचा गंभीर आरोप

By: Editor_Manas

On: Wednesday, July 23, 2025 3:53 PM

Google News
Follow Us

हनीट्रॅप प्रकरण गाजत असताना विजय वडेट्टीवारांचा मोठा दावा – “५० मंत्री आणि अधिकारी अडकल्याची शक्यता, २०० कोटींची वसूली झाली”

मुंबई प्रतिनिधी: मानस मते , २३ जुलै २०२५ : महाराष्ट्रात हनीट्रॅप प्रकरण सध्या चांगलेच गाजत आहे. या मुद्द्यावर आधीच काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी विधिमंडळात आवाज उठवला होता. आता काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विजय वडेट्टीवार यांनीही या प्रकरणात मोठा गौप्यस्फोट केला आहे. त्यांनी सांगितले की, या रॅकेटमध्ये साधारण ५० मंत्री व अधिकारी अडकले आहेत आणि आरोपीने किमान २०० कोटी रुपयांची वसूली केली आहे.

वडेट्टीवार म्हणाले : “हनीट्रॅपचे रॅकेट हे खूपच मोठं आहे. त्यात आजी-माजी मंत्री, वरिष्ठ अधिकारी, राजकीय क्षेत्रातील अनेकजण सामील आहेत. ज्याचं नाव पुढे आलंय, त्या प्रफुल लोढा नावाच्या व्यक्तीने अनेकांकडून पैसे उकळले असून वसूलीची रक्कम किमान २०० कोटी रुपयांपर्यंत पोहोचली आहे. तो कुणाचा कार्यकर्ता आहे हे मी सांगणार नाही, पण लवकरच सगळा तपशील उघड होईल. झाकलेले चेहरे समोर येतील.”

नाना पटोले यांचा आरोप आणि सरकारचा प्रतिसाद

गेल्या आठवड्यात नाना पटोले यांनी विधानसभेत मंत्रालय, ठाणे आणि नाशिक हे हनीट्रॅपचे केंद्र असल्याचा गंभीर आरोप केला होता. त्यांनी यासंदर्भात एक पेनड्राइव्ह देखील सभागृहात दाखवला होता. विधानसभेचे अध्यक्ष यांना निवेदन करण्याचे आवाहनही केले होते. मात्र, सरकारकडून यावर कोणतीही ठोस भूमिका घेण्यात आलेली नाही. उलट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी “ना हनी, ना ट्रॅप… नाना पटोलेंचे बॉम्ब आमच्यापर्यंत पोहोचलेच नाहीत,” अशा शब्दांत खिल्ली उडवली होती.

सुरज चव्हाण प्रकरणावरही सवाल

सुरज चव्हाणने एका छावा कार्यकर्त्याला मारहाण केली होती, मात्र पोलिसांकडून अद्याप कारवाई करण्यात आलेली नाही. यावर वडेट्टीवार म्हणाले, “मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री जर कारवाई करत नसतील तर त्याचा अर्थ ते या प्रकाराला समर्थन देत आहेत. अशा कृतीला पाठीशी घालणे योग्य आहे का? मुख्यमंत्री स्पष्ट भूमिका घेऊन सुरज चव्हाणला अटक करावी, अशी आमची मागणी आहे.”

माणिकराव कोकाटेंवरही निशाणा

कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्यावर देखील विजय वडेट्टीवार यांनी ताशेरे ओढले. “शेतकऱ्यांना आणि सरकारला भिकारी म्हणणारा, सभागृहात रमी खेळणारा मंत्री जर अद्याप पदावर आहे, तर हे सरकार शेतकऱ्यांच्या भावना आणि गरजांबाबत असंवेदनशील आहे, हे स्पष्ट होतं,” असे वडेट्टीवार म्हणाले. “सरकारकडे जर खरंच शेतकऱ्यांबद्दल प्रेम आणि कळवळा असेल, तर कोकाटेंवर तात्काळ कारवाई झाली पाहिजे. अन्यथा रमी खेळणाऱ्या व्यक्तीला कृषी मंत्री म्हणावं लागेल,” असा संतप्त सवाल त्यांनी उपस्थित केला.

For Feedback - puneprahar2018@gmail.com

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now