प्रतिनिधी – मानस, मुंबई : जागतिक पर्यावरण दिन २०२६ निमित्त वांद्रे येथील कार्टर रोड खुल्या रंगमंचावर आयोजित विशेष कार्यक्रमात महाराष्ट्राचे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांनी सहभाग नोंदवत पर्यावरण संवर्धनासाठी सामूहिक प्रयत्नांची गरज अधोरेखित केली. ‘आताच हवामानासाठी’ आणि ‘भूमी नमस्कार’ या उपक्रमांतर्गत आयोजित कार्यक्रमात भामला प्रतिष्ठानचे अध्यक्ष आसिफ भामला यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
हवामान बदलाबाबत जनजागृती निर्माण करण्याबरोबरच प्रत्यक्ष कृतीला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने आयोजित या कार्यक्रमात पर्यावरण संरक्षणाचा संदेश देणाऱ्या देशव्यापी मोहिमेचे तसेच विशेष पर्यावरण गीताचे अनावरण करण्यात आले. यावेळी राज्यपालांच्या हस्ते ‘पर्यावरण नेतृत्व पुरस्कार’ प्रदान करण्यात आले.
कार्यक्रमास सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार, गायक शंकर महादेवन, अभिनेते राघव जुयाल, वेशभूषाकार मनीष मल्होत्रा, आध्यात्मिक मार्गदर्शक गौर गोपाल दास, गायक टोनी कक्कर, अभिनेते अर्जुन बिजलानी, अभिनेत्री मन्नारा चोप्रा यांच्यासह सामाजिक, सांस्कृतिक आणि मनोरंजन क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते.
यावेळी बोलताना आसिफ भामला म्हणाले, “जागतिक पर्यावरण दिन ही केवळ दिनदर्शिकेतील तारीख नसून पृथ्वीप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याची आणि पर्यावरणपूरक कृती करण्याची संधी आहे. ‘आताच हवामानासाठी’ आणि ‘भूमी नमस्कार’ या उपक्रमांच्या माध्यमातून पर्यावरणीय जबाबदारी दैनंदिन जीवनाचा भाग बनविण्याचा आमचा प्रयत्न आहे.”
भामला प्रतिष्ठानने वृक्षारोपण, शहरी वनसंवर्धन, समुद्रकिनारा स्वच्छता, खारफुटी संवर्धन, कचरा व्यवस्थापन आणि जनजागृती मोहिमांद्वारे उल्लेखनीय कार्य केले आहे. संस्थेच्या माहितीनुसार, आतापर्यंत ५० हजारांहून अधिक वृक्ष लागवड, ५५० हून अधिक समुद्रकिनारा स्वच्छता उपक्रम, ८०० पेक्षा अधिक संस्थांचा सहभाग आणि ३० हजारांहून अधिक पर्यावरण रक्षकांचे जाळे उभारण्यात आले आहे.
सायंकाळी झालेल्या कार्यक्रमात वंदे मातरम्, राष्ट्रगीत, महाराष्ट्र राज्यगीत, स्वागत समारंभ, पर्यावरण नेतृत्व पुरस्कार वितरण तसेच पर्यावरणविषयक विविध मोहिमांचा प्रारंभ करण्यात आला. पर्यावरण संरक्षणासाठी समाजातील सर्व घटकांनी एकत्र येण्याचा संदेश या कार्यक्रमातून देण्यात आला.





