पुणे, मे,२०२६ : पैशांबद्दल बोलताना ‘मी कुठे गुंतवणूक करू?’ हा प्रश्न नेहमी विचारला जातो. परंतु, दीर्घकालीन संपत्ती निर्मिती ही केवळ एखादा चांगला फंड निवडण्यावर अवलंबून नसते, तर ती गुंतवणुकीच्या प्रवासात आपण घेत असलेल्या दैनंदिन आणि शिस्तबद्ध निर्णयांवरून ठरते, असा मोलाचा सल्ला ‘एसबीआय म्युच्युअल फंडा’च्या गुंतवणूकदार शिक्षण उपक्रमाद्वारे देण्यात आला आहे.
या उपक्रमात संपत्ती निर्मितीचे मुख्य सूत्र सांगताना खालील घटकांवर प्रकाश टाकण्यात आला आहे.
१) नियमित गुंतवणूक आणि ‘टॉप-अप’: गुंतवणुकीत परताव्याइतकेच रकमेचे सातत्य महत्त्वाचे आहे. उत्पन्न वाढेल तशी ‘एसआयपी टॉप-अप’च्या माध्यमातून गुंतवणुकीची रक्कम वाढवणे दीर्घकाळासाठी फायदेशीर ठरते.
२) आर्थिक सुरक्षा कवच (इमर्जन्सी फंड): आयुष्यात अचानक येणाऱ्या वैद्यकीय किंवा इतर खर्चांसाठी आणीबाणीचा निधी असणे गरजेचे आहे. हा निधी नसल्यास, ऐनवेळी दीर्घकालीन गुंतवणुकीला धक्का पोहोचू शकतो.
३) चक्रवाढ व्याजासाठी वेळेचे महत्त्व: बाजाराची योग्य वेळ साधण्यापेक्षा बाजारात दीर्घकाळ टिकून राहणे महत्त्वाचे आहे. अनेक गुंतवणूकदार लवकर बाहेर पडल्यामुळे चक्रवाढ व्याजाच्या फायद्याला मुकतात.
४) पैशांचे योग्य वर्गीकरण: अल्पकालीन, आणीबाणी आणि दीर्घकालीन अशा वेगवेगळ्या उद्दिष्टांनुसार पैशांचे नियोजन केल्यास गुंतवणुकीत टिकून राहणे सोपे होते.
संपत्ती निर्मितीतील मुख्य अडथळे
बाजारातील अनिश्चिततेच्या काळात ‘एसआयपी’ थांबवणे किंवा वारंवार फंड बदलणे यामुळे गुंतवणुकीच्या सातत्यावर पाणी फेरले जाते. आज माहितीचा मारा होत असताना बाजाराच्या प्रत्येक हालचालीवर प्रतिक्रिया देणे टाळले पाहिजे. गोष्टी अधिक गुंतागुंतीच्या न करता साधेपणा ठेवल्यास शिस्त राखणे सोपे जाते. संपत्ती निर्मिती हा ज्ञानापेक्षा वर्तनाचा खेळ आहे. यात कोणतीही चमत्कारी खेळी काम करत नाही, तर सातत्याने केलेली गुंतवणूक, योग्य वाटप आणि अनिश्चिततेच्या काळात राखलेला संयम यांमुळेच खऱ्या अर्थाने संपत्ती निर्माण होते.





