भेटायला बोलावून तरुणीचा खून; कात्रज बोगद्याजवळील घटनेने खळबळ

By: Editor_Manas

On: Sunday, March 29, 2026 2:32 PM

Google News
Follow Us

पुणे | प्रतिनिधी – मानस : कात्रज परिसरातील भिलारवाडी येथे २५ वर्षीय महिलेचा दोरीने गळा आवळून खून केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी आंबेगाव पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.

मनीषा खम्म दमाई (वय २५, सध्या रा. आयुषी कॉम्प्लेक्स, नऱ्हे) असे मृत महिलेचे नाव आहे. याप्रकरणी किशन भरत परिहार (वय ३५, रा. मानाजीनगर, नऱ्हे) यांनी आंबेगाव पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार प्रकाश अर्जुन तिखात्री (वय ३०, सध्या रा. हिंजवडी, मूळ रा. ढकारी, जि. आछम, नेपाळ) याला अटक करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत मनीषा आणि आरोपी प्रकाश हे दोघेही मूळचे नेपाळचे असून आरोपी पुण्यात रखवालदार म्हणून काम करत होता. आपसांतील संबंधातून दोघांमध्ये वारंवार वाद होत होते. १८ मार्च रोजी प्रकाशने मनीषाला भेटण्यासाठी नऱ्हे परिसरात बोलावले. बोलण्यात गुंतवून त्याने तिला नवीन कात्रज बोगद्याजवळील भिलारवाडी परिसरात नेले. तेथील एका हॉटेलच्या मागील दाट झाडीत त्याने दोरीने गळा आवळून तिचा खून केला आणि घटनास्थळावरून फरार झाला.

दरम्यान, मनीषा बेपत्ता झाल्याची तक्रार नातेवाईकांनी दिल्यानंतर पोलिसांनी शोधमोहीम सुरू केली. २८ मार्च रोजी कात्रज परिसरातील झाडीत एका महिलेचा मृतदेह आढळून आला. परिमंडळ दोनचे पोलिस उपायुक्त मिलिंद मोहिते व सहाय्यक आयुक्त राहुल आवारे यांनी घटनास्थळी भेट देत पाहणी केली.

आंबेगाव पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक गजानन चोरमले यांच्या पथकाने तपासाची चक्रे फिरवत आरोपीचा शोध घेतला आणि त्याला ताब्यात घेतले. पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक फिरोज मुलानी करत आहेत.

For Feedback - puneprahar2018@gmail.com

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now