‘खडकवासला जलाशय रक्षण अभियान’ची यशस्वी द्वितीय वर्षपूर्ती

पुणे  हिंदु जनजागृती समिती मागील २३ वर्षापासून खडकवासला जलाशय रक्षण मोहीम राबवत आहे. धरण परिसरात जलाशय रक्षणाची अखंड, अविरत आणि प्रेरणादायी मोहीम खडकवासला ग्रामस्थ तसेच सामाजिक जाणीव असलेल्या पुणेकरांच्या सहभागातून प्रतिवर्षी होत असते. या मोहिमेचे यंदाचे हे २४ वे वर्ष आहे. भारतीय जनता पक्षाचे विद्यमान आमदार श्री भीमराव (आण्णा) तापकीर यांनी नारळ वाढवून मोहिमेचे उद्घाटन केले. धुलीवंदन आणि रंगपंचमी या दोन्ही दिवशी जलाशयाचे पावित्र्य अबाधित राहावे या संकल्पातून हिंदु जनजागृती समितीचे कार्यकर्ते, खडकवासला ग्रामस्थ, स्थानिक प्रशासन यांच्या सहकार्याने जलाशयाभोवती मानवी साखळी करून जलाशयाचे रक्षण करतात. समितीची ही मोहीम प्रतिवर्षी शतप्रतिशत यशस्वी झाली आहे. मोहीम सुरू झाल्यापासून एकाही व्यक्तीने जलाशयात प्रवेश केला नाही. निसर्गरक्षणाचा ध्यास, समाज प्रबोधनाची तळमळ, कार्यकर्त्यांचा उत्स्फूर्त सहभाग यामुळे ही मोहीम पर्यावरण संवर्धनाचा एक दीपस्तंभ ठरली आहे.

पुणे शहर आणि परिसरातून आलेले २०० हून अधिक धर्मप्रेमी प्रबोधनात्मक फलक हातात धरून खडकवासला जलाशयाभोवती मानवी साखळी करून उभे होते. सकाळी ९ ते सायंकाळी ७ पर्यंत ही मोहीम राबवण्यात आली. या अभियानामध्ये स्थानिक ग्रामस्थांसह, पारगाव, दौंड, सासवड, तळेगाव, भोर,शिरवळ मांजरी, पुणे शहर अशा ठिकाणाहून जागरूक नागरिक सहभागी झाले होते.

या वेळी भारतीय जनता पक्षाचे, खडकवासला विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार श्री भीमराव (आण्णा) तापकीर, पुणे महानगरपालिकेच्या भारतीय जनता पक्षाच्या नगरसेविका सौ. धनश्री दत्तात्रय कोल्हे, भारतीय जनता पक्ष ओबीसी मोर्चाचे महाराष्ट्र प्रदेश सचिव श्री. दत्तात्रय कोल्हे, भारतीय जनता पक्ष युवा मोर्चा खडकवासला विधानसभा मतदारसंघाचे माजी अध्यक्ष सारंग नवले, नांदेड सिटी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. अतुल भोस, हिंदुराष्ट्र समन्वय समितीचे श्री. सचिन घुले, हिंदु जनजागृती समितीचे श्री. पराग गोखले यांसह अन्य मान्यवर उपस्थित होते.

धरणाच्या पाण्यात कोणी उतरू नये, तसेच पाण्याचे प्रदूषण करू नये यासाठी समिती नि:स्वार्थपणे हे कार्य करत आहे. सर्व नागरिकांनी जलस्रोत सुरक्षित राहतील यासाठी प्रयत्नशील राहावे असे आवाहन खडकवासला मतदारसंघाचे भाजप आमदार भीमराव अण्णा तापकीर यांनी केले.

हिंदु जनजागृती समिती, खडकवासला ग्रामस्थ, पोलीस, प्रशासन,जागरूक नागरिक आणि समविचारी संघटना यांच्या वतीने हे अभियान राबवण्यात आले.  प्रबोधनानंतर अनेक नागरिकांनी अभियानाचे विशेष कौतुक केले. पोलीस-प्रशासनाचेही या अभियानाला उत्तम सहकार्य लाभले.

अशाच प्रकारे रंगपंचमीच्या दिवशी म्हणजे 8 मार्चलाही हे अभियान राबवण्यात येणार आहे. यामध्ये सहभागी होण्याचे आवाहन हिंदु जनजागृती समितीच्या वतीने करण्यात आले आहे.