30 मार्च ते 4 एप्रिलदरम्यान राज्यात वादळी पावसाचा इशारा

By: Editor_Manas

On: Sunday, March 29, 2026 2:23 PM

Google News
Follow Us

नागपूर | प्रतिनिधी – मानस : राज्यात 30 मार्चपासून आभाळी हवामानासह दुपारनंतर वादळी पावसाचे नवीन सत्र सुरू होण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. विशेषतः खानदेश, मराठवाडा, पश्चिम विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रातील घाट परिसरातील जिल्ह्यांमध्ये विजांचा कडकडाट, जोरदार वारे आणि पावसाची शक्यता असून काही ठिकाणी गारपीटही होऊ शकते.

31 मार्च रोजी 30 मार्चच्या तुलनेत वादळी पावसाचे प्रमाण काहीसे कमी राहण्याची शक्यता आहे. तरीही या भागांमध्ये अस्थिर हवामान कायम राहून हलक्या ते मध्यम स्वरूपाचा वादळी पाऊस होऊ शकतो.

यानंतर 1 ते 4 एप्रिल दरम्यान पुन्हा वादळी पावसाचा जोर वाढण्याचा प्राथमिक अंदाज आहे. या काळात मध्य महाराष्ट्र, खानदेश, मराठवाडा आणि विदर्भातील विविध भागांत आभाळी वातावरण, दुपारनंतर पाऊस आणि काही ठिकाणी गारपीट होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

दरम्यान, सध्या रब्बी पिकांची काढणी सुरू असल्याने शेतकऱ्यांनी विशेष दक्षता घ्यावी, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे. काढणी केलेली पिके सुरक्षित ठिकाणी साठवून ठेवावीत किंवा झाकून ठेवावीत. वादळी वारे, पाऊस आणि संभाव्य गारपिटीमुळे होणारे नुकसान टाळण्यासाठी आवश्यक ती खबरदारी घेण्याचेही आवाहन करण्यात आले आहे.

तसेच, मेघगर्जना व विजेच्या कडकडाटाच्या वेळी नागरिकांनी आणि शेतकऱ्यांनी स्वतःची व पाळीव जनावरांची सुरक्षितता जपावी. अशा वेळी झाडाखाली, टिनशेडखाली तसेच वीज खांब, ट्रान्सफॉर्मर आणि विद्युत वाहिन्यांच्या जवळ थांबणे टाळावे, असेही प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

For Feedback - puneprahar2018@gmail.com

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now