पुणे : महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभाग तसेच महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी व सांस्कृतिक विकास महामंडळ यांच्या सहकार्याने अण्णा भाऊ साठे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव समिती व निर्मिती मीडिया सोल्युशन्स आठव्या अण्णाभाऊ साठे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाची मोठ्या दिमागात सांगता झाली याप्रसंगी प्रा. सतीश आळेकर, अभिनेते मकरंद अनासपुरे, पंकज चव्हाण (सांस्कृतिक विभाग महाराष्ट्र शासन), सचिनभाऊ साठे (लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे नातू) सुनिल सुकधनकर (दिग्दर्शक व महोत्सव परीक्षक), उमेश कुलकर्णी (दिग्दर्शक व महोत्सव परीक्षक) संतोष पाठारे (चित्रपट समीक्षक), निलेश रसाळ (चित्रपट समीक्षक) राधा खुडे (गायिका), संदिप भाऊ ससाणे (संयोजक) आदी मान्यवर उपस्थित होते.
सतीश आळेकर म्हणाले की, तरुण पिढीचा मोठ्या प्रमाणावरचा सहभाग ही अत्यंत सकारात्मक बाब आहे. चित्रपट व रंगभूमी क्षेत्रात काहीतरी करण्याची तरुणांची इच्छा आशादायक असल्याचे त्यांनी सांगितले. लोकशाहीर अमर शेख आणि अण्णाभाऊ साठे यांच्या विचारांनी समाजाला योग्य दिशा दिली, असे त्यांनी नमूद केले. अण्णाभाऊ साठे यांचे साहित्य हे प्रचारासाठी नसून वास्तववादी आणि सौंदर्यपूर्ण असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. कलेसोबत भाषा आणि विचार यांचा समन्वय साधणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.
संदिप भाऊ ससाणे म्हणाले की अण्णाभाऊ साठे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाने यंदा आठव्या वर्षात पदार्पण केले आहे. प्रारंभी सहा वर्षे संघर्षातून उभा राहिलेला हा महोत्सव आज महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक विभाग व महाराष्ट्र चित्रपट रंगभूमी सांस्कृतिक विकास महामंडळाच्या भक्कम पाठबळामुळे अधिक सक्षम झाला आहे. या महोत्सवाने आशयघन आणि सामाजिक भान जपणाऱ्या चित्रपटांना व्यासपीठ दिले आहे. प्रास्ताविक प्रसंगी संदीप ससाणे बोलत होते.
संतोष पाठारे म्हणाले, अण्णाभाऊ साठे यांच्या कथा-कादंबऱ्यांमध्येच इतकी ताकद आहे की वेगळी मांडणी करण्याची गरज भासत नाही. त्यांच्या शब्दांतून आवाज नव्हे तर जिवंत ध्वनी ऐकू येतो, हीच त्यांची मोठी शक्ती होती. आज प्रगत तंत्रज्ञानाच्या युगात तरुण दिग्दर्शकांनी हा वारसा नव्या ताकदीने पुढे नेण्याचे हे मोठे आव्हान आहे.
सुनील सुकधनकर म्हणाले छोट्या छोट्या ठिकाणांहून चित्रनिर्मिती होत आहे, ही महाराष्ट्रासाठी, देशासाठी आणि लोकशाहीसाठी आनंदाची बाब आहे. डिजिटल तंत्रज्ञानामुळे चित्रपट सर्वसामान्यांपर्यंत पोहोचले आणि ही बाब तुच्छतेची नव्हे तर अभिमानाची आहे. या चित्रपटांतून गावखेड्यातील वंचित-शोषित वास्तव आजही किती विदारक आहे, हे ठळकपणे समोर येते. त्या वेदनेतूनच आशेचा एक धागा निर्माण होतो आणि तोच आशय आमच्यापर्यंत पोहोचतो.
साठे म्हणाले की अण्णाभाऊ साठे यांनी फकिरामध्ये सावळ्याची भूमिका साकारून वास्तव जीवनाचं दर्शन घडवलं. हिंदी चित्रपटांनी श्रीमंतांच्या कहाण्या मांडल्या, तर मराठी चित्रपटांनी कायम शेतकरी-कष्टकऱ्याचं दुःख मांडलं. जोगवासारख्या चित्रपटांतून आणि मकरंद अनासपुरेंसारख्या कलाकारांतून सामान्य माणूस केंद्रस्थानी राहिला. म्हणूनच या विचारांना अण्णाभाऊ साठेंचं नाव देणारी ही संकल्पना अत्यंत अर्थपूर्ण आणि अभिमानाची आहे.
उत्कृष्ट लघुपट द फस्ट फिल्म दिग्दर्शक पियुष ठाकूर, उत्कृष्ट दिग्दर्शक – गणेश शेलार, चित्रपट अंतर, उत्कृष्ट छायाचित्रण – प्रथमेश रंगोळे, चित्रपट केकी, उत्कृष्ट माहितीपट (विशेष उल्लेख), – अॅथलीट्स आर मॅड, दिग्दर्शक ईरा देवकुळे, उत्कृष्ट माहितीपट – ब्रीदिंग ब्ल्यू, दिग्दर्शक अविष्कार रविंद्र, उत्कृष्ट ध्वनी – अभय रुमडे, लघुपट देवा आज पण व्हाय, उत्कृष्ट पटकथा – गणेश शेलार, लघुपट अंतर, उत्कृष्ट संकलन – हिमांशु पिले, लघुपट द फिनिश लाईन, सर्वोत्कृष्ट अभिनेता (पुरुष) विठ्ठल काळे लघुपट “कूस / अंतर / केकी” या लघुपटातील भूमिकांसाठी हा पुरस्कार मिळवला. सर्वोत्कृष्ट अभिनेत्री वासुदेव निशाद लघुपट “प्रियांका बेरिया”, सर्वोत्कृष्ट अभिनेता (पुरुष) – विशेष उल्लेख म्हणून वासुदेव निशाद लघुपट “द फर्स्ट फिल्म”, सर्वोत्कृष्ट अभिनेत्री – विशेष उल्लेख पुरस्कार नीता शेंडे लघुपट “अंतर”, बालकलाकार सर्वोत्कृष्ट बालकलाकार पुरस्कार आरव आहेर लघुपट “केकी”, विशेष उल्लेख बालकलाकार जान्हवी सोनवणे लघुपट “रंग”, अंजली निंबाळकर लघुपट किरण”, तांत्रिक विभाग सर्वोत्कृष्ट कला दिग्दर्शक पुरस्कार आकाश हुमणे लघुपट “फिंगर रिंग” यांना मिळाला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्वाती कडू आणि हेमंत फरांदे यांनी केले.









