पुणे (धायरी) :
महानगरपालिकेत नव्याने समाविष्ट झालेल्या नऱ्हे गावातील मूलभूत सुविधांची अवस्था दिवसेंदिवस बिकट होत चालली आहे. रस्त्यांवरील खड्डे, सांडपाण्याची अकार्यक्षम व्यवस्था, अनियमित पाणीपुरवठा, वाढता कचरा आणि सततची वाहतूक कोंडी यामुळे संतप्त झालेल्या नागरिकांनी शनिवारी (२१ जून) नऱ्हे येथील पारी कंपनी रस्त्यावर रास्ता रोको आंदोलन छेडले.
गांधीगिरी ते आंदोलनापर्यंतचा प्रवास:
स्थानिक रहिवासी भूपेंद्र मोरे यांनी काही दिवसांपूर्वी खड्ड्यांवर गुलाबाची रोपे लावून गांधीगिरीच्या पद्धतीने आंदोलन केलं होतं. मात्र, समस्या सुटण्याऐवजी अधिकच गंभीर झाल्याने अखेर नागरिकांनी रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन केलं. आंदोलनामुळे काही वेळ वाहतूक विस्कळीत झाली.
प्रशासनाला निवेदन आणि इशारा:
आंदोलनावेळी सिंहगड रस्ता क्षेत्रीय कार्यालयाच्या सहाय्यक आयुक्त प्रज्ञा पोतदार आणि उपअभियंता विजय वाघमोडे यांना ग्रामस्थांनी समस्यांसंदर्भातील निवेदन सादर केले. निवेदनात नमूद केलेल्या मागण्या लवकरात लवकर पूर्ण न झाल्यास मुंबई-बंगळूर महामार्ग रोखण्याचा इशारा आंदोलकांनी दिला आहे.
प्रशासनाचा दौरा:
या आंदोलनाची दखल घेत वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिलीप दाईंगडे, वाहतूक विभागाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राजकुमार बरडे, कनिष्ठ अभियंता निशिकांत छापेकर आणि शुभम देशमुख यांनी घटनास्थळी भेट देत परिस्थितीचा आढावा घेतला.