Air raid Siren : हवाई हल्ल्याचा इशारा कधी मिळेल? जाणून घ्या सायरनपासून रडारपर्यंतची संपूर्ण सुरक्षा यंत्रणा, शत्रूचे विमान हद्दीत शिरताच…
जर भारतावर हवाई हल्ल्याचा धोका निर्माण झाला, तर नागरिकांना सुरक्षिततेचा इशारा देण्यासाठी एक महत्त्वाची यंत्रणा सज्ज असते – ती म्हणजे एअर रेड सायरन. पण यामागे काम करणारी यंत्रणा केवळ एक सायरनपुरती मर्यादित नसून, ही एक गुंतागुंतीची, मल्टीलेयर म्हणजेच बहुपर्यायी सुरक्षा यंत्रणा असते. चला तर मग जाणून घेऊया, युद्धजन्य परिस्थितीत देशाचा एअर डिफेन्स सिस्टम कसा काम करतो.
देशाच्या हवाई संरक्षण यंत्रणेवर कोणाचं नियंत्रण?
भारतीय हवाई दल म्हणजेच इंडियन एअर फोर्स ही देशाच्या हवाई हद्दीची सुरक्षा पाहणारी प्रमुख यंत्रणा आहे. ही केवळ लढाऊ विमानांपुरती मर्यादित नसून, संपूर्ण एअर डिफेन्स स्ट्रक्चर अनेक स्तरांमध्ये विभागलेले आहे – ज्यामध्ये रडार, मिसाईल सिस्टीम, सायरन सिस्टीम आणि स्थानिक प्रशासन यांचा समन्वय असतो.
प्रत्येक विमानाची माहिती असते ट्रॅकवर
प्रत्येक सिव्हिल आणि मिलिटरी विमानाला दोन प्रकारचे क्लिअरन्स नंबर मिळतात – ADC (Air Defence Clearance) आणि FIC (Flight Information Clearance).
ADC भारतीय हवाई दल देतं आणि FIC नागरी विमान प्राधिकरण. या क्लिअरन्सनुसार विमानाच्या मार्गाची माहिती एअर ट्रॅफिक कंट्रोलरकडे सतत उपलब्ध असते. त्यामुळे कोणतं विमान कुठून कुठे जात आहे, हे स्पष्टपणे समजतं.
“दोस्त की दुश्मन?” – कशी ओळख होते?
प्रत्येक विमानामध्ये एक IFF (Identify Friend or Foe) ट्रान्सपॉन्डर असतो. हे उपकरण विमानाला स्वतःची ओळख देतं.
जर कोणतंही विमान रडारवर आले आणि त्याचं IFF सिग्नल मिळत नसेल, तर तो संशयास्पद म्हणून विचारात घेतला जातो. दुश्मनाचं विमान आपला IFF सिग्नल बंद ठेवतं, म्हणजे ते सिस्टिममध्ये नोंद न होता रडारवर थेट दिसतं.
हवाई हल्ल्याचं सुरुवातीला कसं समजतं?
देशाच्या सीमांजवळ आणि अंतर्गत भागात असलेल्या विविध प्रकारच्या लांब पल्ल्याच्या आणि छोट्या रडार यंत्रणा २४x७ सक्रिय असतात. जर एखादं अज्ञात विमान देशाच्या हद्दीत घुसत असेल, तर ते लगेच रडारवर दिसतं. रडारची सगळी माहिती इंटीग्रेटेड कमांड अॅण्ड कंट्रोल सिस्टम (ICCS) मध्ये पोहोचते.
सायरन वाजवण्याची प्रक्रिया काय?
१. जर ICCS ला कोणताही संभाव्य हवाई धोका आढळला,
२. तर त्या विमानाचा अंदाजित मार्ग ठरवला जातो,
३. त्या मार्गावर येणाऱ्या शहरांतील स्थानिक सिव्हिल अथॉरिटीला तत्काळ वॉर्निंग पाठवली जाते,
४. त्यानंतर त्या शहरात सायरन वाजवले जातात आणि नागरिकांना त्वरित सुरक्षित ठिकाणी जाण्याचा इशारा दिला जातो.
मल्टी-लेयर सुरक्षा म्हणजे नेमकं काय?
भारतीय हवाई संरक्षण यंत्रणा ही पाच स्तरांमध्ये कार्यरत असते:
लाँग रेंज मिसाईल सिस्टीम – शत्रूचं विमान दूरच रोखण्यासाठी.
मिडियम रेंज सिस्टीम – थोड्या जवळ येणाऱ्या हल्ल्यांचा प्रतिकार.
शॉर्ट रेंज आणि व्हेरी शॉर्ट रेंज डिफेन्स – देशाच्या आत शिरलेल्या विमाने आणि ड्रोनसाठी.
क्लोज-इन वेपन सिस्टीम (CIWS) – शेवटच्या क्षणी हल्ला चुकवणारे शस्त्र.
शोल्डर फायर मिसाईल्स व अॅन्टी एअर गन्स – सैनिकांच्या खांद्यावरून डागल्या जाणाऱ्या क्षेपणास्त्रांचा वापर.
मोबाईल ऑब्झर्वेशन पोस्ट्स आणि मॅन्युअल फीड
केवळ रडार पुरेसे नसतात. काही पोस्ट्सवर मोबाईल रडार आणि काही ठिकाणी डोळ्यांनी निरीक्षण करणारे अधिकारी बसवले जातात.
या सगळ्यांची माहिती केंद्रात एकत्रित केली जाते. एखादा संशयास्पद हालचाल दिसली की लगेच यंत्रणा कामाला लागते.
एअर रेड सायरन फक्त सुरुवात असते…
सायरन वाजतो तेव्हा तो फक्त इशारा असतो. पण त्यामागे आधीच लढाऊ विमाने हवेत पाठवली जातात, मिसाईल सिस्टम तयार ठेवली जाते आणि नागरिकांना सुरक्षिततेसाठी अलर्ट केला जातो.
आजच्या भारतात हवाई हल्ल्याचा धोका ओळखण्यापासून ते नागरिकांना सावध करण्यापर्यंत, एक अत्याधुनिक आणि मल्टीलेयर एअर डिफेन्स सिस्टीम कार्यरत आहे.
एअर रेड सायरन ही त्या प्रणालीतील एक शेवटची, पण महत्त्वाची पायरी आहे – जी आपल्या सुरक्षेसाठी सज्ज आहे.