राजगड, दि. ४ ऑगस्ट : राजगड तालुक्यातील निगडे मोसे गावात गेल्या काही दिवसांपासून नळाद्वारे अत्यंत गढूळ व दूषित पाण्याचा पुरवठा होत असल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे. या गंभीर समस्येबाबत राजगड (वेल्हे) तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष शंकर रोहिदास नलावडे यांनी पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी (BDO) यांना निवेदन सादर करून तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली आहे.
निवेदनात नलावडे यांनी म्हटले आहे की, गावातील नागरिकांना गेल्या काही दिवसांपासून नळाद्वारे गढूळ, दूषित व आरोग्यास अपायकारक पाणी मिळत आहे. हे पाणी पिण्यास अयोग्य असून त्यामुळे उलट्या, जुलाब (डायरिया) तसेच इतर जलजन्य आजारांचा प्रादुर्भाव होण्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे. विशेषतः लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि महिलांच्या आरोग्यावर याचा गंभीर परिणाम होऊ शकतो, अशी चिंता त्यांनी व्यक्त केली आहे.
या पार्श्वभूमीवर संबंधित विभागाने पाणीपुरवठा करणाऱ्या पाईपलाईनची तातडीने पाहणी करून दूषित पाण्याचा स्रोत शोधावा, आवश्यक दुरुस्ती व स्वच्छतेची कामे त्वरित पूर्ण करावीत तसेच गावकऱ्यांना शुद्ध, स्वच्छ व पिण्यायोग्य पाण्याचा नियमित पुरवठा सुरू करावा, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
प्रशासनाने या प्रश्नाकडे दुर्लक्ष न करता तातडीने कारवाई करून नागरिकांच्या आरोग्याची काळजी घ्यावी, अन्यथा ग्रामस्थांसह लोकप्रतिनिधींना तीव्र आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागेल, असा इशाराही शंकर रोहिदास नलावडे यांनी दिला आहे.





