वारकरी संप्रदाय आणि हिंदु धर्म यांच्यात फूट पाडण्याचे कटकारस्थान रचणाऱ्यांच्या विरोधात संघटित होण्याचा निर्धार!
पंढरपूर – वारकरी संप्रदाय हा महाराष्ट्राचा कणा असून महाराष्ट्र जोडण्याची शक्ती या संप्रदायात आहे. काही निधर्मी, डावे आणि पुरोगामी त्याला खिळखिळा करण्याचा प्रयत्न करत आहेत. वारकरी संप्रदाय हा सर्वसमावेशक असून त्याने वेळोवेळी समाजाला दिशा देण्याचे काम केले आहे. अशा वारकरी संप्रदायात वारकरी आणि हिंदु धर्म वेगळे असल्याचे भासवण्याचे षड्यंत्र चालू आहे. वारकरी संप्रदाय आणि हिंदु धर्म यांच्यात फूट पाडण्याचे कटकारस्थान रचणाऱ्यांच्या विरोधात संघटित होण्याचा निर्धार वारकरी महाअधिवेशनात करण्यात आला. वारकऱ्यांच्या विविध प्रश्नांसाठी सद्गुरू श्री गंगागिरी महाराज मठ येथे आयोजित वारकरी महाअधिवेशनात हा निर्धार व्यक्त करण्यात आला.
‘श्री क्षेत्र गोदावरी धाम बेट सरला’चे महंत गुरुवर्य प.पू. रामगिरी महाराज यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या महाअधिवेशनात १००० हून अधिक वारकरी आणि भाविक उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हिंदु जनजागृती समितीचे श्री. धनंजय बोकडे यांनी केले, तर श्री. विनोद रसाळ यांनी अधिवेशनाचा उद्देश स्पष्ट केला.
या अधिवेशनात वारकरी संप्रदायातील हिंदुत्वासाठी कार्य करणारे वारकरी महाराज आणि पूजनीय संत यांना ‘घुसखोर’ संबोधून त्यांचा अवमान करणाऱ्या तथाकथित पुरोगाम्यांचा जाहीर निषेध करण्यात आला, तसेच हिंदुत्वनिष्ठ व संत यांचा ज्ञानेश्वर माउलींची मूर्ती भेट देऊन जाहीर सन्मान करण्यात आला. या प्रसंगी इंचगिरी मठाचे मठाधिपती सुदर्शन महाराज, राष्ट्रीय वारकरी परिषदेचे ह.भ.प. रामदास महाराज चौधरी आणि ह.भ.प. दत्तात्रय चोरघे महाराज यांसह विविध मान्यवर उपस्थित होते.
विशेष सन्मान : हुपरी (कोल्हापूर) येथे विविध मार्गांनी आंदोलन करून अवैध मदरसा पाडण्यास भाग पाडणारे श्री. नितीन काकडे, पंढरपूर येथील श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरातील श्री विठ्ठलाच्या मूर्तीच्या रासायनिक लेपनाच्या विरोधात न्यायालयीन लढा देणारे श्री. गणेश लंके, तसेच गोरक्षणाच्या कार्यात सातत्याने काम करणारे राष्ट्रीय वारकरी सेनेचे उपाध्यक्ष ह.भ.प. अंभोरे महाराज कारभारी यांचा संत ज्ञानेश्वर माउलींची मूर्ती देऊन विशेष सन्मान करण्यात आला.
हिंदूंनी इतिहासबोध, शत्रूबोध लक्षात घेऊन हिंदु धर्मावर होणाऱ्या आघातांच्या विरोधात कृतीशील होणे आवश्यक! – प.पू. रामगिरी महाराज
हिंदू इतिहासातून शिकत नाहीत आणि आपण संघटित नाही. त्यामुळेच अनेक आक्रमकांनी आपल्यावर राज्य केले. धर्मावर होणाऱ्या आघातांविषयी आपण जागृत नसल्याने आज अन्य धर्मीय आणि चुकीचे विचार पसरवणाऱ्यांचे फावत आहे. वारकरी संप्रदाय हा जगाला देण्याचे व जोडण्याचे काम करतो. अशा वारकरी संप्रदायाविषयी आज भ्रमित करणारे विचार पसरवले जात आहेत. ‘समता’ दिंडी काढली जात आहे. आज काही जण पंढरपूरचा पांडुरंग हा विठ्ठल नसून अन्य कुणीतरी असल्याचे सांगत आहेत. जगात धर्म एकच असून तो म्हणजे सनातन धर्म आहे. लोकांना आज हिंदु धर्माचे महत्त्व न समजल्याने ते अन्य पंथांत जात आहेत. ‘लव्ह जिहाद’चे लोण आता प्रत्येक खेड्यापाड्यापर्यंत पोहोचले आहे. लहान मुलांचाही बुद्धिभेद करून त्यांना इस्लामच्या प्रार्थना शिकवल्या जात आहेत. गोवंश रक्षणाच्या संदर्भात सरकारने मे महिन्यात एक अध्यादेश काढला आहे. त्यानुसार एखाद्या परिसरात अवैध रीतीने गोहत्या झाल्यास त्याला पोलीस, तहसीलदार आणि प्रशासन तितकेच उत्तरदायी असणार आहे. हे लक्षात घेऊन आपण प्रशासनास गोहत्या थांबवण्यास भाग पाडले पाहिजे.
संप्रदायात घुसलेले खरे घुसखोर कोण, हे सांगण्याची आता वेळ आली आहे! – सुनील घनवट, हिंदु जनजागृती समिती
संघटित असलेल्या वारकरी संप्रदायात हेतुपुरस्सर दुफळी माजवण्याचे आणि त्यांचा जाणीवपूर्वक बुद्धिभेद करण्याचे काम चालू आहे. श्री विठ्ठलाच्या भक्तीचे वर्णन करणारे जगद्गुरू तुकाराम महाराज यांचे अनेक अभंग असतांना जाणीवपूर्वक ‘अल्लाशिवाय कुणी श्रेष्ठ नाही’, ‘अल्ला दिलावे-अल्ला खिलावे’, अशा प्रकारे केवळ एकांगी प्रसार करणारे फलक वारीच्या वाटेवर लावले जात आहेत. हे षड्यंत्र आपण वेळीच ओळखून ते हाणून पाडले पाहिजे. वारकरी संप्रदायात घुसलेले खरे घुसखोर कोण आहेत, हे सांगण्याची आता वेळ आली आहे. महाराष्ट्रासाठी वारकरी संप्रदाय प्राण असून हिंदु धर्म आत्मा आहे! दिल्लीतील कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनात पेपरफुटीच्या विरोधात चालू असलेल्या आंदोलनाच्या नावाखाली पोलिसांच्या गाड्या फोडण्यात आल्या, पोलिसांवर आक्रमण करण्यात आले. तिथे दंगलसदृश परिस्थिती होती. यात देशविरोधी घोषणा देण्यात आल्या. हे देशविरोधी षड्यंत्र आपण लक्षात घेऊन त्याविरोधात कृती करण्याचा निर्धार केला पाहिजे.
विहिंपचे ह.भ.प. नारायण महाराज शिंदे म्हणाले, ‘‘वारकऱ्यांच्या भोळेपणाचा लाभ घेऊन काही लोक त्यांना निरनिराळ्या प्रकारची आमिषे दाखवून बुद्धिभेद करण्याचा प्रयत्न करतात. तरी यापुढील काळात वारकरी संप्रदायात घुसलेले कीर्तनकार शोधून काढून त्यांना समोर आणणे आवश्यक आहे!’’ राष्ट्रीय वारकरी परिषदेचे प्रवक्ते ह.भ.प. महेंद्र महाराज म्हस्के म्हणाले, ‘‘सध्या देव, देश, धर्म यांच्यापुढे अनेक मोठी आव्हाने आहेत. संप्रदायासाठी काम करणारे अनेक लोक धर्माच्या व्यासपीठावर येऊन त्यांचे मत व्यक्त करण्यास घाबरतात; मात्र प.पू. वक्ते महाराज यांनी सांगितल्याप्रमाणे ‘अगोदर आपण वैदिक सनातन हिंदू आहोत आणि मग वारकरी आहोत’, हे नेहमी लक्षात ठेवावे लागेल.’’ राष्ट्रीय वारकरी परिषदेचे प्रवक्ते ह.भ.प. निवृत्ती महाराज हल्ल्याळीकर म्हणाले, ‘‘महाराष्ट्र सरकारने गोवंश हत्याबंदी कायदा लागू केला; मात्र हा कायदा कठोर केला पाहिजे. सर्व तीर्थक्षेत्रे मद्य-मांसमुक्त केली पाहिजेत. इंद्रायणी व चंद्रभागा या पवित्र नद्या स्वच्छ झाल्या पाहिजेत.’’
विश्व हिंदु परिषदेचे केंद्रीय सहमंत्री श्री. दादा वेदक म्हणाले, ‘‘देव, देश, धर्म यांवर होणाऱ्या आघातांच्या विरोधात वारकऱ्यांनी आवाज उठवला पाहिजे. वारकरी संप्रदायाची भक्ती, समर्पण आणि त्याग कुठेही अल्प होता कामा नये! वारकरी संप्रदाय समाजमूल्ये जतन करण्यासाठी सतत प्रयत्न करत आहे. सध्या कुटुंब व विवाह संस्थांवर घाला घालण्याचे काम चालू आहे. समाज आणि राष्ट्र यांना जोडणारा दुवा म्हणून आदर्श कुटुंबव्यवस्था उभी केली पाहिजे. प्रत्येक हिंदू कुटुंबाने आपला एक तरी मुलगा धर्माच्या कार्यासाठी दिला पाहिजे!’’ राष्ट्रीय वारकरी परिषदेचे अध्यक्ष ह.भ.प. मारुती महाराज तुनतुने-शास्त्री म्हणाले, ‘‘अन्य धर्मीय संघटित असल्याने त्यांच्या प्रत्येक मागणीची नोंद शासनाला घ्यावी लागते, तर हिंदू संघटित नसल्याने आज हिंदु धर्मावर आघात होत आहेत. गोमातेला राजमातेचा दर्जा असतांना पशुवधगृहांना अनुमती दिली जाते, हे दुर्दैवी आहे.’’
प्रज्ञापुरी ज्ञानपीठ अक्कलकोटचे पीठासीन धर्माधिकारी श्री. प्रसाद पंडित म्हणाले, ‘‘रासायनिक वज्रलेपाच्या संदर्भातील फोलपणा माहीत असूनही जाणीवपूर्वक श्री विठ्ठल मंदिरातील शासकीय समितीने वज्रलेप करण्याचा अट्टाहास केला. यातील फोलपणा पुराव्यासह मंदिर महासंघ आणि वारकरी संप्रदायाने समोर आणला, तसेच न्यायालयीन लढाईद्वारे त्यावर स्थगिती मिळवली होती.’’
विविध ठरावांना ‘हर हर महादेव’च्या गजरात पाठिंबा! : पंढरपूर येथील पुरातत्त्व विभागाच्या श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरातील रासायनिक वज्रलेपन या धर्मविरोधी निर्णयाच्या विरोधात वारकरी आणि मंदिर महासंघ यांनी लढा दिला आणि यापुढील काळात कोणत्याही प्रकारची रासायनिक वज्रलेपन प्रक्रिया करू नये; संत, संतवाङ्मय, राष्ट्रपुरुष, धर्म, देवता आदींचा अवमान करणाऱ्यांवर कठोर कारवाई होण्यासाठी ईशनिंदा प्रतिबंधक कायदा लागू करावा; प्रस्तावित ‘महाराष्ट्र देवस्थान इनाम निर्मूलन अधिनियम २०२६’ स्थगित असून यापुढे सरकारने देवभूमीचे रक्षण करणारा ‘देवस्थान भूमी संरक्षण कायदा’ लागू करावा, यांसह करण्यात आलेल्या विविध ठरावांना वारकरी-भाविकांनी ‘हर हर महादेव’च्या गजरात पाठिंबा दिला, तसेच ठराव एकमताने संमत केले.





