पुणे : राज्यातील सर्वसामान्यांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या मोठ्या दूध भेसळ रॅकेटचा पुणे ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने आणि अन्न व औषध प्रशासनाच्या संयुक्त पथकाने मोठा पर्दाफाश केला आहे. राज्यातील आतापर्यंतच्या सर्वात मोठ्या कारवाईंपैकी एक मानल्या जाणाऱ्या या मोहिमेत तब्बल अडीच कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून १३ जणांना अटक करण्यात आली आहे.
या प्रकरणी पुणे, सोलापूर, अहिल्यानगर, संभाजीनगर, सांगली आणि भिवंडी अशा सहा जिल्ह्यांमध्ये एकाच वेळी छापेमारी करण्यात आली. मंचर (जि. पुणे) येथील दोघांना अटक केल्यानंतर या संपूर्ण रॅकेटचे धागेदोरे उलगडल्याची माहिती तपास यंत्रणांनी दिली.
प्राथमिक तपासात हा भेसळीचा काळा व्यवसाय गेल्या दोन वर्षांपासून सुरू असल्याचे समोर आले आहे. आरोपी दूध अधिक प्रमाणात तयार करण्यासाठी वास नसलेला शाम्पू, दूध पावडर आणि विविध रासायनिक द्रव्ये मिसळलेले पाणी वापरत असल्याचे उघड झाले आहे.
तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, ५०० लिटर शुद्ध दुधात सुमारे ३०० लिटर, तर १,००० लिटर दुधात तब्बल ५०० लिटर रासायनिक पाणी मिसळून भेसळ केली जात होती. त्यानंतर हे दूध नामांकित दुग्धव्यवसाय कंपन्यांना पुरवले जात असल्याचा संशय आहे. या दुधापासून विविध दुग्धजन्य पदार्थ तयार होऊन ते सर्वसामान्य ग्राहकांपर्यंत, अगदी लहान मुलांपर्यंतही पोहोचत असल्याने या प्रकारामुळे मोठी खळबळ उडाली आहे.
ही कारवाई पुणे ग्रामीण पोलिसांच्या २५ आणि अन्न व औषध प्रशासनाच्या २० अधिकाऱ्यांच्या संयुक्त पथकाने केली. या रॅकेटमध्ये आणखी काही मोठ्या व्यक्ती किंवा व्यावसायिकांचा सहभाग असण्याची शक्यता असून त्या दृष्टीने सखोल तपास सुरू आहे.
दूधासारख्या अत्यावश्यक अन्नपदार्थात अशा प्रकारे विषारी रासायनिक भेसळ करून नागरिकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या आरोपींवर कठोर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी सर्व स्तरांतून होत आहे.





